घाव अजुनी...

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

मातृभाषेच्या ठेकेदारांच्या सनातनीपणाचे व अहंगंडाचे काय करायचे?

शिक्षण हे मातृभाषेतून हवे हे निर्विवादरित्या मान्य आहे. प्राथमिक पातळीवर तर ते मातृभाषेतूनच हवे.

मराठी बोलणाऱ्या कुटुंबात वाढणाऱ्या अपत्याचे जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरु होते तेव्हा त्याचा भावनिक कोंडमारा होतो. त्याचा इंग्रजी संकल्पना समजून घेण्याचा प्रवास मराठी संकेत- इंग्रजी अर्थ -इंग्रजी संकेत या व अशा आडवळणांच्या मार्गाने चालतो.

उदा. त्याला स्काय शब्द शिकायचा तर स्काय शब्द ऐकल्याबरोबर पहिल्यांदा तो त्याचा मराठीतला अर्थ शोधतो जेव्हा आकाश हा शब्द सामोरा येतो तेव्हा कुठे मग स्काय ही संकल्पना स्पष्ट होते.

पण मराठी भाषाव्यवहाराची अघोषित मालकी ज्यांच्या कडे आहे त्यांना जगात जे काय श्रेष्ठ आहे ते आपल्याच कर्तृत्वाने कसे आहे हे लांड्यालबाड्या करुन का होईना जागोजाग पटवून द्यायची सवय जडलेली आहे. त्यामूळे जेव्हा विज्ञान मराठी भाषेतून शिकायचा प्रश्न येतो तेव्हा मराठी रुपांतर करतांना अवाजवी सनातनीपणा केल्याने व्यवहारात बोलल्या ऐकल्या जाणाऱ्या मराठी विज्ञानापेक्षा हे मराठीतले विज्ञान म्हणजे बोजडपणाचा उत्तम नमुना ठरते. यातली भाषा मराठी असते पण ती मातृभाषा मराठी नक्कीच नसते.

उदा. सनातनी पणाने इंग्रजी भाषेतील शब्दांचा मराठीत केलेला अनुवाद पहा

कॉम्प्यूटर - संगणक, डिस्क- चकती, टायपिंग-टंकलेखन, किबोर्ड-कळफलक, ऑपरेशन-शल्यचिकित्सा, आयसीयू- अतिवदक्षता कक्ष, सुपरवायझर- पर्यवेक्षक

या सर्व शब्दांपैकी जे मूळ इंग्रजी शब्द आहेत तेच वापरुन मराठी बोलली जाते. ती मराठीच असते इंग्रजी नव्हे.

मराठी भाषांतर करुन कायदा, विद्यूत अभियांत्रिकी (?) या विषयांवरची लिहीलेली पुस्तके वाचली की हा बोजडपणा अधिक प्रकर्षाने जाणवतो.

ज्या बाबी मूळात पाश्चात्य किंवा इंग्रजी जगतातल्या आहेत त्या फक्त लिपि व उच्चारात किरकोळ फेरफार करुन वापरल्या तर मराठी भाषेत विज्ञान व इतर तत्सम शाखांमधले ज्ञान घेणे अधिक सुलभ होईल.

विज्ञान शाखेत भरपूर नवीन लेख/पुस्तके/मासिके प्रसिद्ध होत असतात. ही बहुतेक करून इंग्रजीत असतात.

हे म्हणणे मान्य पण मराठीतून किंवा जगातल्या कुठल्याही भाषेतून जेव्हा विज्ञान शिकले जाते तेव्हा त्यातला मूळ शब्द संग्रह जो की बहूतेक करुन (वैज्ञानिक प्रगतीचे आद्यस्थान असल्याने) युरोपीय भाषांमधून येतो तो किरकोळ उच्चार व लिपीतले बदल करुन वापरला आणि इंग्रजीचे फक्त एक भाषा म्हणून (जसे की आजही घेतले जाते) शालेय जीवनात शिक्षण घेतले तर असे लेख किंवा मासिके इत्यादी वाचायला व समजून घ्यायला अडचण येणार नाही.

उदा.
Photosynthasis means the process in which light energy is transfer in to chemical energy with the help of chlorophyll.
या वाक्यातले फोटोसिंथेसिस आणि क्लोरोफिल हे शब्द जसेच्या तसे ठेऊन ही संकल्पना आपण मराठीतून शिकलेलो असलो आणि इंग्रजी फक्त एक भाषा म्हणून शिकलेलो असलो तरी चटकन लक्षात येते.
मूळात फोटोसिंथेसिस म्हटले की उर्जा रुपांतरणाची प्रक्रिया मनासमोर यायला हवी त्यात फोटोसिंथेसिसचा मराठी अर्थ प्रकाशसंश्लेषण, क्लोरोफिल चा अर्थ हरितद्रव्य (की लवके) आणि मग सारी प्रक्रीया असा किचकट प्रवास करायची गरजच नसावी.

इंग्रजीतले असे शब्द मराठीत भरमसाठ आले तर मूळ मराठी राहील का असा प्रश्न यावर हमखास येतो.
पण मूळ भाषा म्हणजे भाषेचे व्याकरण, त्यातली शब्दसंपत्ती तर भाषेला समृद्ध करते.
(पण संस्कृत शब्दानी भाषा समृद्ध होते आणि इंग्रजी, फार्सी शब्द भाषेचे प्रदुषण करतात हा दुटप्पीपणा आपण कधी सोडणार)
जोपर्यंत हे व्याकरण, भाषा व्यवहार करणाऱ्यांची भाषेची रुपे सुलभ करण्याची प्रवृत्ती (प्रमाणीकरणा वाल्यांच्या प्रमाण भाषेत गावंढळपणा) जो पर्यंत कायम आहे तो पर्यंत भाषा वेगवेगळी वळणे घेत समृद्ध होत राहणारच. पण आहे ते आपल्यापूरते मर्यादित ठेवण्याच्या अप्पलपोटेपणापोटी (मराठी भाषेतले तत्सम व तद्भव शब्द कोठले हे फक्त ठराविक लोकांनाच माहित असते परिणामी शुद्ध मराठी आम्हीच समजू शकतो हे ही आलेच) विज्ञान हवे इंग्रजीतूनच अशी भूमिका येते.

कालच कलेक्टरच्या पी.ए.ची आपाईंटमेंट घेऊन आलो. पूढच्या महीन्यात सेकंड विकला तुमचे काम सक्सेस होईलच अशी ग्यारंटी देलीय तेनं.
असं सहजपणाने बोलणारा सामान्य मराठी शेतकरी वर्गातल्या माणसाच्या घरातली मूलं फक्त भाषा म्हणून जरी इंग्रजी शिकले तरी चालेल.
इंग्रजी भाषेतून शिक्षण हा आग्रह नकोच.


परिस्थिती सुधारते आहे.

सध्या वीजमंडळाचे त्रिभाजन झाल्यापासून परिस्थितीत काही योग्य बदल घडतांना दिसत आहेत. उदाहणार्थ वीज चोरीचा गुन्हा अजामिनपात्र झाला आहे. राजकीय हस्तक्षेप बऱ्यापैकी कमी झाला आहे. आणि दिलिप वळसे पाटलांपासून सुरु झालेले वीज निर्मितीचे प्रयत्न आता अजित पवारांच्या कारकिर्दीत वेग घेत आहेत. म्हणजे अपेक्षित निधीची तरतुद वगैरे या प्रक्रिया जलद गतीने होत आहेत. शेवटी पाण्याची कमतरता हा प्रश्न कायमचा आहेच पण मागणी वाढत असतांना त्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीत वाढ करु शकले नाही हे ही सत्यच. गोडबोले समितीने महाराष्ट्राला आगामी काळात नव्या निर्मिती प्रकल्पाची आवश्यकता नाही असा अहवाल दिला होता. ( चालू वीज गळती (म्हणजे वीज चोरीच) थांबली की महाराष्ट्राला पूरेशी वीज उपलब्ध आहेच असे या समितीते म्हणणे होते. आणि ते खरे ही होते.) पण वीज चोरी थांबवण्यात आलेले अपयश आणि वाढत्या मागणीचा चुकलेला अंदाज या पायी महाराष्ट्र वीजेच्या बाबतीत दीनवाण्या परिस्थितीत येऊन पोहोचला आहे. पण पूर्वी सर्रास गावेच्या गावे आकडे टाकून वीज वापरायची ते चित्र आता दिसत नाही. मध्यमवर्गातही वेगवेगळ्या युक्त्या वापरून होणारी वीजेची चोरी नव्या डिजिटल मिटर मुळे कमी झाली आहे. विनाकारण वीज उपकरणे चालू ठेवण्याचे प्रमाणही (बील जास्त येईल म्हणून) कमी झाले आहे. एकंदरीत आगामी काही वर्षात वीजेची परिस्थिती समाधानकारक असेल अशी आशा करायला हरकत नाही.

तिसरी कंपनी. या कंपनीचे वीज वाहक जाळे अत्यंत जुनाट व अकार्यक्षम आहे. सरकारी कंपन्यांचे जेवढे म्हणून तोटे असतात ते त्यांना आहेत. त्यांची देखभालीची यंत्रणा अतिशय अकार्यक्षम व मोडीत काढण्याच्याच लायकीची आहे. या सर्व गोष्टींमुळे वीज गळती, चोरी या सारख्या अपप्रवृत्तींचे चांगलेच फावले आहे.
लेखकाचे वरील मत मात्र एकांगी वाटते. वीज काही तांत्रिक कारणामूळे जाते व नंतर ती पंधऱा मिनीटे ते तासभरात पूर्ववत होते हे म्हणजे मोडीत काढण्याच्या लायकीच्या यंत्रणेचे काम नक्कीच नसावे. महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळात व आजच्या त्याच्या नव्या स्वरुपातही त्रुट्या असतील यात वाद नाही पण तरीही या व्यवस्थेचे मानंदड आणि कामातील आजवरची प्रगती ही देखील नजरेआड करता कामा नये.

अवांतर आणि संशयास्पद
केंद्र शासनाच्या खाण मंत्रालयाने दगडी कोळशाच्या खाणी असणारे काही ब्लॉक्स खाजगी कंपन्यांना कोळसा काढण्यासाठी दिलेले आहेत. या कंपन्या पूरेशा कार्यक्षमतेने कोळसा काढत नाही म्हणून मंत्रालयाने नुकत्याच काही कंपन्यांना नोटीसा दिल्या. पाच कंपन्यांचे परवानेही रद्द केले. काही दिवसांपूर्वी राज्यांच्या उर्जामंत्र्यांची बैठक केंद्राच्या वतीने घेण्यात आली त्यात अजित पवारांनी या कंपन्या पूरेसा कोळसा पूरवत नसल्याबद्दल तक्रार केली. जो पूरवठा होतो तो ही निकृष्ट दर्जाचा कोळसा असल्याने तो वीज निर्मिती क्षमतेवर तसेच उपकरणांच्या आयुष्यावरही विपरीत परिणाम करणारा ठरतो.
यातल्या काही कंपन्या स्वतः वीज निर्मिती करणाऱ्या आहेत. महानिर्मिती कडून जेव्हा वीज कमी प्रमाणात निर्मीती होते तेव्हा महावितरणला ती खाजगी कंपन्यांकडून विकत घ्यावी लागते. (अर्थातच वाढीव दराने) महावितरणला अशी वीज विकणाऱ्या काही कंपन्याच कोळशाचा उपसा व पूरवठ्याची कामे कंत्राटी पद्धतीने करतात. परिणामी त्यांच्या या वागणूकीत काही संशयास्पद आहे काय अशी विचारणाही अजितपवारांनी या बैठकीत केली आहे. केंद्रातही राष्ट्रवादी सत्तेत भागीदार असल्याने हा प्रश्न गोपीनाथ मुंड्यांच्या मार्फत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्याची व्यवस्था करण्यामागेही कदाचित आपल्या राज्याचे उर्जामंत्री असावेत.

मराठीत इंग्रजी अशी नको

खरे तर महाराष्ट्रातल्या प्रमाणीकरण करणाऱ्या वर्गाने मराठी भाषा म्हणून आजपर्यंत जो घोशा लावला आहे तो ते जी तथाकथित प्रमाण भाषा बोलतात त्या भाषेपायीच आहे. इंग्रजी शब्दांचा आधार घेत सोवळेपणा जपतांना जी भाषा बोलली जाते ती सुध्दा मराठीच असल्याचा दावा ही मंडळी सहज करु शकतात (उदा.मला तरी दुसर्‍या भाषेतील शब्दांचा आधार घेण्यात काहीच गैर वाटत नाही. ) परंतु यातून एकच जाणीव स्पष्ट होते ती म्हणजे ग्राम्य म्हणून किंवा लोकभाषा म्हणून जी भाषा बोलली जाते ती मराठी मराठी भाषा जंतूसंसर्ग झालेली आहे. (दुसऱ्या भाषेचे रबरी ग्लोव्ह घालून निर्जंतूक करता येतं. ) आपल्याच भाषेतल्या या शब्दसामर्थ्याला आपण संसर्गासारखे टाळत असू आणि त्याहूनही त्यासाठी दूसऱ्या अर्थात प्यूअर भाषेचा आधार घेत असू तर आपण आपल्या भाषेवर अन्यायच करतो. आजकाल नाकाला शेंबूड आला असे न म्हणता नाक आले असे म्हणण्याची पद्धत होते आहे.


चला काही शब्द वाटत असतील आज लाजिरवाणे पण म्हणून मराठीतच त्याला सरळ सोपा पर्याय का शोधू नये. त्यासाठी प्यूअर भाषेचा आधार कशाला. ग्रामीण भागातच वापरले जाणारे पर्याय पहा.

संडासला जाणे - परसाकडे जाणे

साप चावला - पान लागलं

मासिक पाळी असणे - शिवायचे नाही.



अवांतर - जेव्हा एखाद्या परकीय वस्तूसाठी अथवा घटना प्रयोगासंबंधी आपण शब्दप्रयोग करतो तेव्हा तो ओढूनताणून मराठीत करायची आवश्यकता नसावी. कॉम्प्यूटर, रेल्वे, कॅलक्यूलेटर, टेलिफोन हे शब्द परकीय उपकरणांचे आहेत. त्यांच्या शोधकर्त्यांनी त्यांना तसे संबोधले मग आपण ते शब्दच मराठी म्हणून (उदा. कॅलक्यूलेटर हाच शब्द मराठी शब्द) वापरायला हवे. ऑक्सफर्ड च्या शब्दकोशात गंगा, कृष्ण हे शब्दच इंग्रजी शब्द म्हणून समाविष्ट झाले आहेत.

या अशा वापराने मूळ मराठी ही नामशेष न होता अधिक विस्तार पावेल.लवचिकता हा भाषा अस्तित्व टिकण्यातला महत्त्वाचा भाग ठरतो. एरव्ही ज्ञानेश्वरी व गाथेतली भाषा आजच्या भाषकांच्या निरुपणाशिवाय पचनी पडत नाही . परंतु तरीही तीही मराठीच होती आणि आजची भाषाही मराठीच आहे. उद्याची कदाचित इंग्रजी शब्दांनी समृद्ध असेल पण तरीही मराठीच असेल. एखादी भाषा ही तिच्या व्याकरणीक व स्वरसंरचनेच्या स्वरुपात मूलभूत स्वरुपात अस्तित्वात असते. उदा. माझे सरनेम जाधव आहे. हे मराठी वाक्य झाले. माझे आडनाव आहे जाधव. हे इंग्रजी .

महीलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण याबद्दल...

पुरूषांवर अन्याय?


या आरक्षणामूळे पुरूषांवर अन्याय होत असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत असले तरी तरी ते तसे नसुन माझ्या मते आजवरच्या पूरुषी वर्चस्वाचे परिमार्जन ठरावे. आजही शंभरटक्के जागांवर स्रियांना उभे राहण्याचे स्वातंत्र्य असले तरी किती टक्के स्रियांना लोकसभेला उभे राहण्यासाठी त्यांच्या घरातील पूरुष परवानगी (!) देतील याचा ही विचार व्हायला हवा.

पुरूषांना बंदी ?

स्रियांसाठी आरक्षित केलेल्या फक्त तेहतिस टक्के जागांवर पुरूषांना उभे रहायला बंदी असणार आहे. हा पदांसाठी इच्छुक पुरूषांवर अन्याय असला तरी आजवर पुरूषांनी स्रियांना शंभरटक्के जागांवर उभे राहायला अलिखित बंदी घातलेली आहे त्याचे काय?

पुरूष मतदारांवर अन्याय?

एखाद्या मतदारसंघात सगळे पुरूष उमेदवार असले तर तो स्रीमतदारांवर अन्याय ठरतो असे आपण म्हणू शकत नाही. त्याच न्यायाने स्री साठी आरक्षित मतदारसंघातील पूरुष मतदारांना उभ्या असलेल्या स्रियांपैकी कुणालाही मत देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतांना त्याला अन्याय कसे म्हणता येईल. कोणत्याही एका चांगल्या, सुशिक्षित, विकासाची जाण व तळमळ असलेल्या स्री उमेदवाराला मत देण्याचे स्वातंत्र्य (जे की आपण आजवर पुरूष उमेदवारांच्या संदर्भात भोगून आपल्या लायकी परीक्षणाचे अनेक नमूने उभे केले आहेत) असतांना एका स्रीला मत द्यावे लागणार म्हणून अन्यायाची बोंब ठोकणे हे अप्पलपोटेपणाचे लक्षण आहे.

पडद्यामागचे पुरूष?

स्रियांच्या आरक्षणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा कारभार पडद्यामागून पुरूष चालवतील, चालवतात हे मान्य. मूळात त्या स्रीला निवडणूकीला उभे करण्यासाठी तयार करण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत हे पडद्यामागचे पुरूषच कार्यरत असतात. मग ते त्या सत्तेच्या वापर करणारच झाले. पण एकदा सत्तास्थानी पोचलेली स्री ही नंतर आत्मविश्वासाने स्वतःचे निर्णय घेण्याच्या (प्रसंगी पुरूषांचा विरोध टाळून) क्षमतेपर्यंत येईलच.

मागासवर्गीय स्री?

स्रियांसाठीच्या आरक्षणात मागास व मुस्लीम स्रियांना आरक्षण असावे ही मागणी म्हणजे मागास स्रियांचे कैवारी असल्याचा डंका मिरवत पूरुषांचे फायदे जपण्याचा प्रकार दिसतो. परंतु तरीही स्रियांसाठीच्या आरक्षणांतर्गत मागास स्रियांसाठी आरक्षण ही या आरक्षणाची अनुभवांती पूढची पायरी होऊ शकते. या मुद्यापायी सगळ्या स्रियांच्याच आरक्षणात खोडा घालणे योग्य ठरत नाही.

एकंदरीत

स्री आजवर पूरुषाच्या हातचे शारीरिक, सांस्कृतिक आणि मनस्वी खेळणे बनून राहीली. पूरुषांनीही तिला कधी दासी तर कधी माता तर कधी देवी म्हणून झुलवत ठेवले. पण आपल्या अज्ञानापोटी आणि या अज्ञानातच आपला आत्मसन्मान मानण्याच्या व्यवस्थित (पूरुषांकडून) जोपासल्या गेलेल्या मानसिकतेपोटी स्रीने आजवर खऱ्या अर्थाने पूरुषाला आपले सर्वस्व बहाल केले आहे. तिने तिच्या अस्मितेची झापडे बंद केली असेही म्हणता येते त्याच बरोबर सगळे जाणवत असूनही पुरूषाशी मांडलेल्या सहजीवनापायी सारे सोसले असेही म्हणता येते. आज स्री आरक्षण म्हणा की अजून काही अशा बाबी म्हणा पूरुषांकडून स्रीला काहीतरी अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करतांना निदान जाणीवेच्या कक्षा विस्तारलेल्या माणसांनी तरी त्यांच्यातल्या पुरूषाला चरफडू देऊ नये असे वाटते.

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

अस्सल मराठी

भाषा ही मग ती कोणतीही असो कालपरत्वे तिच्यात बदल होत आलेले आहेत आणि हेच भाषेचे स्वभाववैशिष्ट्यही आहे. दंडूकेशाहीने भाषा बदलायचे प्रयत्न करणाऱ्यांना मात्र प्रत्येकवेळी तोंडघशी पडावे लागते. ग्रामीण भागातून शहरात आल्यावर किंवा शहरी मध्यमवर्गीय संस्कृतीशी संपर्क आल्यावर हळूहळू शब्दांच्या वापरात आपसूकच बदल होत जातात. चार मध्यमवर्गीयांच्या समुहात एखादा इरसाल शब्द किंवा वाक्यप्रयोग झाला तर लगेच भुवया उंचावल्या जातात. परंतु ग्रामीण भागात तुझ्या मायला तुझ्या


असली वाक्ये दोन जिवलग मित्र गप्पा मारतांना कितीतरी वेळा सहजपणाने उच्चारुन जातात. तशीच गत जातीवाचक शब्दांचीही आहे. जातींनी माणसामाणसात उतरंडी निर्माण केल्या परंतु दोन वेगवेगळ्या जातीतले मित्र त्यांना जातीचा विखारीपणा अहंपणा कळु लागेपर्यंत अतिशय मोकळेपणाने दुसऱ्याच्या जातीचा उल्लेख टिकास्पदरित्या करतात. आणि तो अगदी सहजपणाने होतो. च्या मायला तुमी सोनार अन् कोनाला होनार.... किंवा चुंगुस मारवाडी असले वाक्यप्रयोग कित्येकदा खेळीमेळीच्या वातावरणात कानी पडतात. असो.  परंतु समोरच्यावर टिका करतांना ग्रामीण जीवनाच्या संचितातुन येणारा जातीतला उल्लेख आणि सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्यांकडून कुत्सितपणे केली जाणारी शेरेबाजी यातले अंतर राखायला हवेच. त्यासाठी मग काही शब्द टाळता आले तर उत्तमच. पण तरीही भाषा ही आपले सांस्कृतिक व सामाजिक व्यक्तिमत्व घेऊन प्रकट होत असते. ते जोपर्यंत अस्सल महाराष्ट्रीयन आहे तो पर्यंत मराठीला वरुन कितीही रंग फासण्याचे प्रयत्न झाले तरी तिचा मूळ स्वभाव जायचा नाहीच.

ओथंबून...

भावनांचा धिंगाणा
निवांत जरी सर्वस्तर
सघन घन वर्तुळांनी
व्यापून हा परिसर.

शहाऱ्यांचा उत्सव
हे सुस्काऱ्यांचे शहर
अंगभरून मोहोर
नि रिक्ततेचा कहर.

सुरूंग तर सर्वत्र
पण वाती अशा अजाण
चूरगाळून कुस्ककरण्या
अवघडून स्वत्वप्राण.

ओथंबून महाकाय
वादळून जलाशय
कृत्रिम या अटकावाचे
सरणारच आता वय.
***

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

एका सुंदर कलेचा अस्तकाल...अपरिहार्य.

सुंदर हस्ताक्षर हा दागिना आहे पण आजकाल दागिने कोण घालतो हे ही तितकेच खरे. बाकी ज्यांचे अक्षर सुंदर असते त्यांचा स्वभावही टापटीप आवडणाराअसतो असे माझेही निरीक्षण आहे. मुळात टापटीप आवडण्यातूनच सुंदर हस्ताक्षर आपसूक अंगी बाणले जात असावे असे वाटते. आजकाल संगणकाच्या युगात सुंदर हस्ताक्षराचे कौतूक आणि हातावर अतिशय सुंदर व बारीक शेवाया करणाऱ्या आईचे कौतूक या दोन्ही गोष्टी एकाच पठडीतल्या. कारण आता यांत्रिकी करणामूळे विनासायास जर सफाईदार अक्षर लिहीणे (आणि अर्थात शेवाया करणे) जमत असेल तर जून्या कलांना जोपासण्याचा अट्टहास धरणे हे नॉस्टाल्जिकच (गतकालरमणीय ??) म्हणावे लागेल. मी शालेय जीवनापासून माझ्या हस्ताक्षराचे तोंडभरून कौतूक ऐकत आलो आहे. अगदी अलिकडे ही सुंदर मराठी अक्षर पाहीले की लोक आनंदाची (आणि आश्चर्याचीही) प्रतिक्रीया देतात. बऱ्याचदा अर्ज वगैरे लिहीतांना मी मुद्दाम हस्ताक्षरात देत असे. कारण टंकलेखन किंवा संगणकावरून अर्ज तयार करणाऱ्यांचे अक्षरच मूळात चांगले नसते असा माझा समज होता. पण संगणकाच्या युगात हस्ताक्षराने अर्ज लिहून वेळ व श्रम वाया घालवणे हे मागासलेपणाचे लक्षण असल्याचे बोधामृत प्राशन केल्यावर मी हस्तलिखिताच्या अट्टहासातून (आणि सुंदर हस्ताक्षराच्या गर्वातून) बाहेर आलो. आज शतकी बेरजा व वजाबाक्या करणे आपल्याला कैलक्यूलेटर शिवाय जमत नाही. आणि विसाच्या पूढचे पाढे पाठ करणे हे तर आदीमपणाचेच लक्षण ठरेल. (पावकी , सवाकी, दिडकी आठवल्या...) त्यामूळे आता लिहीण्याची बाब ही संगणकीय झाली आहे. काहीबाही सटरफटर नोंदी पूरत्या उरलेल्या हस्ताक्षरलेखनालाही आता जड अंतःकरणाने का होईना निरोप द्यायलाच हवा.

मानसिक कमकुवतपणा

अग्नीसमाधी, जलसमाधी हे प्रकार आत्महत्येचेच आहेत. जीवनात भरलेले नैराश्य आणि त्याला सामोरे जाण्याची हळूहळू संपुष्टात येत चाललेली क्षमता आणि त्याबरोबरच कधीही कुणी न पाहीलेले परंतु आपल्या गुढपणामूळे कायम आकर्षण निर्माण करणारे मृत्युनंतरचे काल्पनिक जग या सगळ्या बाबी याला कारणीभूत आहेत. आध्यात्मिक कहाण्यांच्या आत्यंतिक आहारी जाण्यामूळे मोक्ष, स्वर्गप्राप्ती यांचा पगडा डोक्यावर बसून असली कृत्ये हातून घडून जातात. तत्कालिन झिंगलेपणातून असे काही करण्याची हिंमत निर्माण होते. मग ती झिंग रागाची असो की भक्तीची तो एक आत्मघाती अपघातच असतो. सामान्य जीवन जगणारी, रोजच्या हजार दुःखांना सामोरे जाऊन प्रसंगी त्यांना नतमस्तक करणारी माणसे या लोकांपेक्षा खरे तर श्रेष्ठ म्हणायला हवीत.

ज्ञानेश्वरांच्या विचारांची ओढाताण करून त्यांना शंकराचार्यांचे अनुयायी म्हणण्यार्‍यांना..

उगाच कसलं काय मिथ्या वगैरे! छ्या..!
जग आहे, जगात सुख आहे आणि दुःखही आहे. दुःखाशी सामना करत करत विधायकतेने जास्तीत जास्त सुखी होउन जगण्याचा प्रयत्न करत जीवन जगणे हे सत्यच. राबराब राबून काडीकाडी चा संसार उभा करून कृतकृत्य होऊ पाहणाऱया माणसाला तुझी सारी मेहनत म्हणजे निव्वळ फुकाचा व्यवहार आहे असे सांगणे म्हणजे जगाला सुखे सगळी मिथ्या म्हणायला लावून आपल्या सुखाची सोय लावण्याचा व जितेपणीच ब्रह्मप्राप्ती करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे.
जगाचा निरास करून मला पहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या या सर्वसमावेशक तत्वज्ञानापायीच त्यांना तत्कालिन कर्मठ वर्गाच्या टिकेचे ( कि अत्याचाराचे ) धनी व्हावे लागले. आज आश्चर्यकारकपणे संत ज्ञानेश्वरांचे मोठेपण सगळ्यांना जाणवू लागले आहे. (अरेच्या आपल्याला पिवळा चालत नाही आणि हा तर सगळ्या जगाला चालतो आहे. मग काय करावे बरं... चला हा पिवळा जरी दिसतो तरी तो खऱया अर्थाने लालच कसा आहे हे पटवून देऊ या.) कंसातल्या अशा सुप्त इच्छाशक्ती पायी अवघी ज्ञानतपश्चर्या ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाहून वेगळे नाही. परंतु ज्ञानदेवांनी त्याच दिशेने चिद्विलासवादाकडे जी झेप घेतली तीच ज्ञानेश्वरीची अपूर्वता आहे."अशी ओढाताणीची विधाने करण्यात खर्ची घातली जाते. त्या पेक्षा ज्ञानेश्वरांना जगणे हे व्यर्थ या पाखंडी तत्वज्ञानाचे खंडन करुन जगत् व्यवहारात नवी उर्जा निर्माण केली हे खळखळ न करता मान्य केले तर काय बिघडते हा माझा भाबडा प्रश्न आहे.

समानता व विषमतेविषयी

समानता व विषमतेविषयी पहिल्यांदा काही बाबी स्पष्ट करु. पूढे मी जे काही लिहीतो आहे त्यात सुधारणा करण्यासारखे बरेच काही असू शकेल हे सर्वप्रथम मान्य करतो. समानते विषमतेला शब्दात बसवण्याआधी काही गोष्टी आधी गृहीत धराव्या लागतील त्या म्हणजे.
समाजातले लोक हे स्वतःची योग्यता समजण्याइतपत ज्ञानी आहेत. हे ज्ञान त्यांनी सारासार विचार करून मिळवले आहे. ते कुणाच्या अंधप्रभावाखाली नाहीत. मला माझ्या योग्यतेपेक्षा जास्त मिळवण्याचा अधिकार नाही. जर जास्त मिळवायचे तर माझी योग्यता वाढवणे याशिवाय दूसरा कुठलाही पर्याय नाही हे सर्वांना मान्य आहे. प्रत्येकजण योग्यता वाढवत गेला तरी एकापेक्षा दूसऱ्याचे स्थान हे कायम वेगळे असेल आणि लाभांचे वितरण त्या त्या प्रमाणात होईल.
समानता -– माझे कर्तृत्व किती याची मला पूर्णतः जाणीव आहे आणि माझ्या कर्तृत्वास साजेशी संधी आणि योग्यते इतका मोबदला जो की सभोवतालच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत ज्या प्रमाणात मला मिळायला हवा त्या प्रमाणात मला मिळतो आहे असे प्रत्येकाला वाटणे म्हणजे समता असणे.
विषमता -– माझी योग्यता मला पूर्णतः माहित आहे. परंतु माझ्या योग्यतेनुसार मला संधी मिळत नाही. आणि योग्यता नसतांना इतरांना मात्र लायकीपेक्षा जास्त मिळते आहे. अशी भावना काही गटात असणे म्हणजे विषमता.
समानते विषमते विषयी हे लिहितांना त्या आधी कल्पिलेली सामाजिक परिस्थिती ही प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक आहे. परंतु पूर्णांशाने असा समाज कधीही अस्तित्वात नव्हता मग यापूढे तो तसा होईल का. याचे उत्तर तो अधिकाधिक तसा असणे हे समाजिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ठरते हे समजून घेण्यात आहे. यात माझ्या मनगटात ताकद आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे लोकांना भ्रमित करण्याइतपत चालाखी आहे म्हणून मी जास्त मिळविन असा विचार करणाऱया वृत्ती समाजात कायमस्वरुपी असणार आहेतच किंबहूना याच माझ्या योग्यता मग मला यानुसार जास्त मिळालेच पाहीजे असा अविचारही मांडला जाईल. या विचारांना मर्यादित ठेवणे, त्यांचा इतर समुहावर प्रभाव पडणार नाही याची दक्षता घेणे यासाठी प्रचलित शासनपद्धतीचा आधार घेता येईल.
विषमता हा प्रश्न सुटण्याच्या शक्यतेतला नाहीच असे म्हणून हातपाय गाळून बसणे योग्य ठरणार नाही. या समस्येवर उत्तर आहे. कदाचित मला ते पूर्णांशाने नाही देता आले तरी ते नाहीच असे म्हणून कसे चालेल ?

फलज्योतीषाच्या खरेखुरेपणाच्या चाचणीचा प्रयोग

माझ्या मते फलज्योतीष हे अशा चाचणीच्या पात्रतेचे नाही. माझा ज्योतिषातला अभ्यास किती असा प्रश्न या ओघाने उपस्थित होईलच. पण हा अभ्यासाच्याही लायकीचा विषय नाही असे माझे स्पष्ट मत आहे.  नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या सोबतच्या तज्ज्ञांनी घेतलेली चाचणी पूर्णतः तटस्थपणे घेतलेली आहे. आणि तिचे निष्कर्ष कुठल्याही सारासार विचार करणाऱया माणसाला मान्य होण्यासारखे आहेत. यासाठी नवीन कुठल्या चाचणीची गरज खरे तर अजिबात नाही. लेखनात एके ठिकाणी असा मुद्दा आहे की फलज्योतिषाला खरेपणा सिद्ध करावयाचा असेल तर त्याने अशा चाचण्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे. परंतु अशा चाचण्यांमधून फलज्योतिषाचा खरेपणा सिद्ध होण्याऐवजी त्याचा खोटेपणाच अधिकाधिकपणे उघडा पडेल याची खात्री असल्यानेचे बहूतांश ज्योतिषी या चाचण्यांना विरोधच करतील. आणि ही सगळी मंडळी अशी चाचणी सुचवण्यासाठी किंवा सुचवलेल्या चाचणीच्या सर्वमान्य त्रुटी दाखवण्यासाठी कुठेही पूढे येणार नाहीत. मात्र एकदा का चाचणीचे निष्कर्ष जाहीर झाले की त्यावर शब्दांच्या कसरती करुन ती कशी पोकळ आहे हे सांगण्यास अहम्अहीकेने पूढे येतील. कारण मूळात ज्योतिष सांगणारे सगळे बुद्धीमान लोक आहेत. आणि त्यांना खात्रीने माहित आहे की आपण जे सांगतो आहे ते म्हणजे निव्वळ भाकडकथेत जमा होणारे आहे. हे खरे होण्याची शक्यता छापाकाटय़पैकी काय पडेल अशा प्रकारातली आहे. म्हणून भविष्य चुकले की जन्मतारखेच्या चुकीपासून ते भविष्य सांगणाऱयाला भविष्यातले मूळात काहीच कळत नाही हा दावा करण्यापर्यंतची कारणे त्यांच्या पोतडीत आधीपासूनच तयार असतात. असो. वर म्हटल्याप्रमाणे फलज्योतीषाच्या खरेपणाविषयी चाचणी तयार करणे म्हणजे समोरचा रंग लाल आहे हे ढळढळीत दिसत असतांना तो लाल आहे हे कसे सिद्ध करावे याची चाचणी तयार करणे होय. हा म्हणजे हातच्या कांकणाला आरशात पहाण्याचा प्रकार झाला. तरीही मी (या क्षणापूरता थोडासा जास्तीचा मूर्ख होऊन) जी चाचणी सुचवतो आहे तशा चाचण्या इतरही विद्वान लोक सुचवतील. त्यापैकी जी चाचणी प्रकाश घाटपांडे निवडतील तिच्यावर आधी सांगोपांग चर्चा व्हावी आणि यात फलज्योतिषाच्या समर्थकांचा आणि अभ्यासकांचा (!) जास्तीत जास्त सहभाग कसा होईल (निदान उपक्रमवरच्या तरी) हे पहावे. अशा कुठल्याच चाचणीला मान्यता देण्यास ही मंडळी समोर आली नाहीत तर चाचणी घेऊन काहीही उपयोग होणार नाही. कारण त्यांच्या लेखी चाचणीचे स्वरुप व निष्कर्ष त्यांच्या लेखी त्यांना विचारात न घेता मांडले गेले असल्याने ते मान्य होणार नाहीत व विज्ञानवाद्यांची कुत्सित चाल म्हणून सगळेचे निकालात निघेल. आणि मला याचीच शक्यता जास्त वाटते. तरी बघू काय होते ते.
चाचणीचा पहीला प्रकार
१.ही चाचणी फलज्योतीषाच्या सहाय्याने मुलाचे तो जन्मल्यानंतरच्या पाच वर्षापर्यंतचे भविष्य अचूक वर्तवल्याजाऊ शकते या मुद्यावर आधारीत आहे. फलज्योतीषाला जर चाचणीच्या पूर्णत्वासाठी चाळीस पन्नास वर्षांचे आयुष्य हवे असेल तर हा प्रकार तितकाच कालावधी घेईल.
२.चाचणीसाठी ज्यांचा सहभाग घ्यावयाचा आहे त्या कुटुंबातील महिला गरोदर असावी व पूढील महिनाभरात तिच्या प्रसूतीची तारीख असावी.
प्रसूती ज्या रुग्णालयात होणार आहे त्याचे अक्षांश रेखांष तज्ज्ञांच्या सहाय्याने निश्चित करुन घ्यावे. ते जर अधेमध्ये असतील तर असे निश्चित अक्षांश रेखांश सांगता येणारेच रुग्णालय निवडावे. किंवा अशा रुग्णालयातील प्रसूतीच चाचणीसाठी निवडावी.
३.जन्माची वेळ नोंदवतांना संबंधित डॉक्टर व परिचारीकांच्या स्वाक्षऱया घेऊन नोंदवावी.
४.हय़ा काळ आणि स्थळानुरुप जन्मपत्रिका तयार करावी व त्यानुसार सर्वमान्य ज्योतीषांच्या गटाने त्या बालकाचे पूढील पाच वर्षाचे भविष्य नेमक्या भाषेत व लेखी स्वरुपात वर्तवावे.
५.पाच वर्षानंतर हे भविष्य खरे की खोटे हे संबंधित बालक, त्याचे आईवडील, शाळेतील शिक्षक यांच्या तटस्थ मुलाखतींद्वारे ठरवावे.
हे निष्कर्ष फलज्योतिषाच्या अर्थातच विरोधात जातील पण त्यावर काही जालीम उपाय निघेलच. पहीला म्हणजे या चाचणीत भविष्य वर्तवणारे जे ज्योतिषी निवडल्या गेले होते त्यांना भविष्याचे ज्ञानच नव्हते त्यामुळे ही चाचणीच खोटी आहे. एखादा म्हणेल की माझे मत विचारात न घेता ही चाचणी झाली (चाचणी ठरतेवेळी मी पोटशूळाने आजारी होतो ) म्हणून हा सगळा फलज्योतीषाच्या विरोधकांचा कट आहे.
चाचणीचा दूसरा प्रकार
हा दूसरा प्रकार म्हणजे घाटपांडे यांनी आयोजित केलेली चाचणीच होय. यात आईवडीलांच्या स्वाक्षरीने मुलांच्या जन्माची तारीख वेळ व स्थळ यांचा तक्ता मागवावा व त्यांचे भविष्य जन्मापासूच्या पंधरा वर्षापर्यंतचे वर्तवून घ्यावे. ही मुले आजच पंधरा वर्षापेक्षा जास्त वयाची असावी म्हणजे लगेच शहानिशा करून निष्कर्ष हाती येतील. मुलांच्या कुटुंबांची नावे, आडनावे मात्र संकेतीकरण करुन ज्योतीषांपासून गुप्त ठेवावीत.
पण या चाचणीचे भविष्य घाटपांडे यांनी घेतलेल्या पहील्या चाचणी सारखेच असेल. ज्यांचे भविष्य बरोबर आले नाही त्यांच्या एकतर जन्मतारखा चुकलेल्या असतील किंवा ज्योतीषाची पद्धत चुकलेली असेल किंवा कुटुंबात कुणीतरी काही चुकीचे वर्तन केल्याने असे झाले असेल. भविष्य खरे की खोटे ठरवायला ही चाचणी उपयोगी नसून दुसऱयाचाचणीचा शोध घ्यायला हवा असा विचार पूढे येईल.
एक अनुभव
अकरावीच्या वर्गात असतांना कन्नड तालुकय़ातल्या (जि.औरंगाबाद,महाराष्ट्र) सारोळा या गावी आम्ही पाच मित्र एका निश्चयाने गेलो. या गावच्या जवळ असणाऱया डोंगरावर धोका आहे आणि शनिवारच्या रात्री त्या डोंगराकडे वळून पाहिल्यानेही दूसरा दिवस वाईट जातो ही ठाम समजूत. दूपारी आम्ही शेतवस्तीवरच्या आमच्या मित्राच्या कुटुंबासहीत इतर काही लोकांना रात्री डोंगरावर मुक्कामाची कल्पना सांगितली. सगळ्यांनी आमचे काय काय होईल याच्या काही गंमतीशीर कल्पना मांडल्या. आमच्या मित्राच्या आईवडीलांची तर तयारीच नव्हती. शेवटी त्यांचे म्हणणे मान्य असे म्हणून आम्ही खळ्यावर झोपायला जायची परवानगी घेतली. रात्री जेवण आटोपल्यावर एक टार्च, एक काडेपेटी आणि एक मोठी सतरंजी घेऊन आम्ही रात्री अकराच्या सुमारास जंगलातून वाट काढत डोंगराच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो. काटक्या गोळा करुन शेकोटी पेटवली. गप्पा मारता मारता रात्री कधीतरी चंद्र उगवला. या चंद्रोदयाचे आणि नंतरच्या सुर्योदयाचे त्या दरम्यानच्या गाढ शांत झोपेचे वर्णन मला कदाचित येथल्या मूळ विषयापासून दूर नेईल. सकाळी गावातल्या लोकांचा धोक्याचा समज दूर झाला असे वाटत असेल तर मंडळी फसलात. आम्ही जाळ पेटवल्यामूळे आमचा धोका टळला होता. आमच्या एका मित्राच्या गळ्यात ओमची प्रतिमा होती म्हणून आमचा धोका टळला होता. आमच्यापैकी एका मित्राचे नाव दत्तात्रय होते म्हणून धोका टळला होता. नाहीतर आमची काही धडगत नव्हती..... हूश्श.........ऽऽऽऽ..!
(गावातील लोकांनी स्वतःचा समज न बदलण्यामागे फक्त त्यांची जैसे थे वृत्ती आणि इतर काही त्यांच्या वृत्तीवरील पगडे असतील इथे ज्योतीषाबद्दल स्वतःचे मत बदलले तर सरळसरळ कमाईवरच पाणी सोडावे लागेल. हा फायदा सुटू नये म्हणून कुठल्याही मार्गाने फलज्योतिषाचे खरे स्वरुप उघड होण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरूच राहतील.)

सगळेच लबाड

ब्राह्मण काय , मराठा काय किंवा महार काय जातीचा अभिमान बाळगणारे, लाज बाळगणारे तिच्या समर्थनासाठी पुस्तकीज्ञान खर्ची करणारे सगळेच लबाड आहेत. मी किती पूरोगामी हे न सांगता आमची जात कशी पूरोगामी हे सांगण्याची आता नवी टूम निघाली आहे. जातीची या व्यवस्थेची असली फडतूस समर्थनगीरी करण्यापेक्षा म्हणू द्या ना कोणत्याही जातीला कुणालाही काही. तुमच्या माझ्या पूर्वजांचे नाव घेऊन कुणी बोलले तर प्रतिवाद करा. ही जात अशी होती म्हणणा-याला ती जात तशी नव्हती असे सांगणे हा ही जातीचाच प्रसार आहे. शेवटी भुकेल्या पोटाशी जेव्हा सगळ्या गोष्टी येऊन पोहोचतात तेव्हा जात कुठे असते. तेव्हा फक्त मुलभूत प्राणच तेवढा असतो ना. मग त्याचीच धरा ना लाज जरा. कुणाची जात ओळखण्याचा प्रयत्न करणार नाही की माझी जात कुठे दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा अमलात आणा. जातींनी पूर्वी पापे केली ती काही जातींनी भोगली आता आम्ही पापे करू तुम्ही भोगा हे कुठपर्यंत. विवेक जागा करा. याचाही शेवट होईल. स्वतःपासून सुरूवात कराल तर आशावादी रहायला काहीच हरकत नाही. शेवटी जातीप्रथा वाईट किती यावर खरडत बसण्यापेक्षा ही नाहीशी करायला काय उपाय करता येईल आणि तो स्वतः तुम्ही किती अमलात आणता ते सांगा.

एक स्वप्न

सकाळी सकाळी जाग आली. अंथरुणावर उठून बसल्याबसल्या जांभई दिली. पुन्हा स्टाइलिशपणे एक चुटकीही तोंडासमोर वाजवली. आणि पाचर बसल्यासारखे तोंड उघडेच राहीले. काही केल्या बंद होईना.अंगाचा थरकाप उडाला. आरशासमोर जाऊन उभा राहिलो. माझी ती केविलवाणी अवस्था बघून डोळ्यातून आसवे ओघळली. आता काय करावे. तशास अवस्थेत कसेबसे कपडे घातले आणि तोंडाला हात लावून बाहेर आलो. रस्त्याच्या पूढच्याच वळणावर एक हॉस्पिटल होते. तिथे गेलो. लोक विचित्र नजरेने पहात होते. वेटींगरुम मध्ये दोनजण आधीच होते. तोंडाला हात लावलेल्या अवस्थेत तिथे बसलो. एकेक क्षण युगासारखा वाटत होता. तेवढ्यात डॉक्टरांनी आत बोलावले. तोंडाला चार वेळा हाताने इकडून तिकडून तपासले. मग म्हणाले, "उशीर केलात. लवकर आला असतात तर काही करू शकलो असतो." सगळे ब्रम्हांड आठवत होते. आईवडील, भाऊबहीण, माझे कॉलेजचे मित्र. आता आपलं कसं होईल. हॉस्पिटल बाहेर आलो. सैरभैर.............................. जाग आली तेव्हा अंग घामाने थबथबलेले होत. हे स्वप्न होतं या आनंदाने हरखुन गेलो. आरशापूढे जाऊन तोंड हवे तसे उघडून मिटून बघितले. आयुष्यातल्या पूढच्या प्रत्येक जांभईच्यावेळी हे स्वप्न मला वाकूल्या दाखवून जाते. अगदी आजतागायत.
स्वप्नांचा जसा आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटनांशी संबंध असतो तशीच ती बहूतेकवेळा अतर्क्य असतात. एखादे स्वप्न पडतांनाच हे स्वप्न आहे व हे आपल्याला आगोदर पडले होते याची जाणीव ही काही वेळा होत असते. स्वप्नात काही कारणाने जाग आली तर पून्हा लगेच झोपल्यावर त्या स्वप्नाची लिंक पून्हा जुळते याचा ही अनुभव ब-याच जणांनी घेतला असेल. एकूण काय तर जाणीवेच्या कक्षेबाहेर धावू पाहणारा हा विषय चर्चेला भरपूर अवकाश देणारा आहे. माझे स्वप्न खुपच अतार्कीक. असे वाटणा-यांनी आपली अशी स्वप्ने (अर्थात खरीखुरी) शेअर करायला हे चांगले निमित्त ठऱावे.

पौराणिक वा आधूनिक सर्वच असले लेखन स्वाभाविक

 'मराठी लिखाण आणि लैंगिकता' या 'मुक्तसुनीत' यांच्या लेखाबदद्ल...
मराठी असो की जगातल्या कोणत्याही वाङ्मयातले साहित्य असो ते त्या त्या स्थलकालपरत्वे अस्तित्वात असलेल्या जनमानसांचे प्रतिबिंब बहूतेकवेळा असते. माणूस हा वेगळेपणाच्या कितीही बढाया मारत असला तरी तो अंतिमतः एक प्राणीच असतो. आणि प्राण्यांच्या स्वाभाविक खोडी त्याच्या अंतरंगात कायम दडून बसलेल्या असतात. वर सांस्कृतिकतेची, माणूसपणाची जाड गोधडी त्यानं पांघरलेली असते. पण मूळ पातळीवर आल्यावर त्यांचे हे पाशवीपण उचल खातेच. विरूद्धलिंगी व्यक्तीबदद्ल असलेले लैंगिक आकर्षण हे वंशवृद्धीच्या आदीम प्रेरणेचे द्योतक मानले गेले आहे. पूराण काळात (आणि आताही) सामान्य माणसाने लैंगिकतेबद्दल बोलणे हे निषिद्ध मानल्या गेल्याने देवदेवतांच्या तसेच पूराणातील इतर नायक नायिकांच्या प्रणयकथा (खरेतर भोगकथा) सविस्तर वर्णन करून सांगितल्या गेल्या. सामान्यांना संस्कृतचे गम्य नसल्यामुळे (आजही ) अक्षरशः दैवी फळांच्या प्राप्तीसाठी आजही या किळस आणणा-या कथांची पारायणे सुरू आहेत. (एक चपखल उदाहरण- गुरूचरित्र पारायण) संस्कृत जर सर्वश्रुत असती तर लोकांनी या पारायणकारांना पिटाळून लावले असते. सारांशाने या पूराणकारांनी किंवा गौरी देशपांडे, मेघना पेठे, विभावरी आदींनी असे कसे काय बुआ लिहीले या वर चर्चा करण्यापेक्षा आपले लक्ष वेधून घेणारे असे त्यात काय आणि का आहे हे निरलसपणे समजून घेतले तर आश्चर्य वाटण्याचे कारणच उरणार नाही. लैंगिकतेवर मुक्त लिहीले जाते म्हणून ना पूराणे वाईट ना आधूनिक मराठी साहित्य वाईट. पूराणे अन्वयार्थाने व आरोपणाच्या माध्यमातून (ब-याचशा छुप्या सामाजिक उद्देशांनी ) मानवाच्या मूलभूत प्रवृत्तींशी भिडली तर आजच्या साहित्याने कुठलीही भीड न बाळगता जे असते ते साहित्यात उतरवले इतकेच.

पक्षी

स्वतंत्र, मुक्त, स्वच्छंद
असं काही म्हणायचं तर,
पक्षीच येऊन बसतात
उदाहरणांच्या फांद्यांवर.

पक्षी तसे नशीबवान असतात
खेडं असो गाव असो की असो शहर
किंवा महानगरही असू देत
करतील घरटं हवं तिथे
कित्येकदा मोडलं तरी..

पिलांना भरवण्याचं सामर्थ्य
घेऊन येतातच ते जन्मजात,
कुठल्याही पदवी शिवाय
कुठल्याही स्पर्धेशिवाय...












***