घाव अजुनी...

शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

तुझ्या हाकेसरशी

तुझ्या हाकेसरशी
पापण्या थरारल्या,
धडधडले काळीज
चित्तवृत्ती फुलारल्या.

तुझ्या हाकेसरशी
बांगड्यांची किणकिण,
अंगावरती गोड शहारे
पैंजणांची रुणझुण.

तुझ्या हाकेसरशी
कासावीस झाला प्राण,
विखुरल्या बटा
नुरले पदराचे भान.

तुझ्या हाकेसरशी
झाला जादूटोणा कसला?
अन माझ्या खानदानी
कुळाचा पाया खचला.

तुझ्या हाकेसरशी
भररात्री आले,
आयुष्य सारे उरलेले
पहाटेच्या शोधात गेले.
000

शनिवार, २४ एप्रिल, २०१०

दरबारात तुझ्या...

दरबारात तुझ्या
भक्तीची मात झाली,
पोटासाठी दिवा झाला
चैनीसाठी वात झाली.

तुझ्या अभिषेकाचे पाणी
कोणत्या शेतात गेले,
पाण्यातूनही कमाई
अन पिकांचेही नफे झाले.

देवा तुझी भूक
कुणी जिवंत केली,
शांतीची यात्रा मनापासून
तिजोरीपर्यंत नेली.

तुझ्या बडेजावाने रे
नित्य डोळ्यांचे दिपणे,
विसरू लागले तुझे आता
भक्ताघरी खपणे.

तुझ्या वरास्तव आता
पुण्याई का साठवू?
ही जमलेली रक्कम सांग
कोणामार्फत पाठवू?
000

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

वाईट करणाऱ्यांचे खरेच वाईट होते काय?


महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे. मंदीरातील अभिषेक बंद करण्यावरुन वाद घालणाऱ्या पुजारी आणि इतर संबंधित मंडळींचे हात दानपेटीतल्या भ्रष्टाचारात देखील प्रत्यक्षअप्रत्यक्षरीत्या गुंतलेले आहेत हे या निमित्ताने स्पष्ट झाले. मंदीरातील मुर्तीला अर्पण केल्या जाणाऱ्या साडीचोळीचा लिलाव होऊन ह्याच साड्या पुन्हा अव्वाच्या सव्वा किमतीला भक्तांच्या माथी मारल्या जातात हे सर्वांना माहित असेलच. पण तुळजाभवानीच्या दानपेटीतील दागिन्यांचा इतक्या पद्धतशीर पणे अपहार करुन गब्बर बननाऱ्यांचे हे कृत्य त्यांच्या अपूर्व धाडसाची प्रचीती देऊन जाते. ( इथे कुणाचे चारआणे किंवा एखादी पेन्सिल चोरली तर देव शिक्षा देईल याचा आम्हाला भयंकर धाक असतो.) तुळजाभवानीच्या गुप्तदानपेटीत भाविक जो पैसा व दागिने टाकतात त्याचा दरमहा लिलाव करण्याची पद्धत आहे. या लिलावात फक्त ठराविक लोकांनाच भाग घेता येईल याची व्यवस्था केली गेलेली आहे. या लिलावाच्या मूळ बोली रक्कमेत व लिलावात भाग घेण्याच्या शुल्कात गेल्या दहा पंधरा वर्षात अवघ्या काही हजारांची वाढ झालेली आहे. आणि या शुल्काचा फक्त काही हिस्सा घेऊन अनेकांना लिलावात भाग घेऊ देण्याचे औदार्य अनेकवेळा दाखवण्यात आलेले आहे. आणि जे काही शुल्क घेतले त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. गेल्या दहा ते बारा वर्षापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष व धर्मादाय आयुक्तांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्याच्या नियमालाही तिलांजली दिली गेली. हे सगळे आपल्या उपस्थितीत व्हायला हवे याची तत्कालीन जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त यांना माहित नसण्याचीच शक्यता आहे किंवा हेतूपूरस्सर त्यांना त्याकडे दुर्लक्ष केले असणेही शक्य आहे. या सगळ्या लबाड साखळीत अनियमितपणा निर्माण झाल्यामुळे म्हणा की काही अन्य कारणामूळे म्हणा या सर्व प्रकाराबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. धर्मादाय आयुक्तांनी दानपेटीत जमा होणाऱ्या देणगीची सरासरी काढण्याच्या उद्देशाने एक महिन्याच्या अंतराने दानपेटी उघडली तेव्हा त्यात तब्बल बावीस लाख रुपये रोख, त्रेचाळीस तोळे सोन्याचे दागिने व साडेपाचकिलो चांदीच्या वस्तू आढळून आल्या. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षातील लिलावाची माहिती प्रशासनाला देतांना संबंधितांकडे दहा वर्षात सेहेचाळीस ग्राम सोने व अर्धा कीलो चांदी इतकेच दान जमा झाल्याची माहिती दिली होती. एकंदरीत लोकांच्या श्रद्धाभावनेचा (!) गैरफायदा घेऊन लिलावात सहभागी लोकांनी वर्षानुवर्ष स्वतःचे उखळ पांढरे करुन घेतले. लोकांच्या श्रद्धेशी खेळू नका असे म्हणत मूर्तीची झीज होत असल्याचा अहवाल असतांनाही अभिषेकांवरच्या बंदीला विरोध केला. या सर्वात त्यांना भवानीच्या कोपाची भीती कशी वाटली नाही याचा विचार भोळीभाबडी जनता आता करत असेल. पण या लोकांना नक्की माहित असते की आपल्या समोर जो मांडला आहे तो फक्त दगड आणि तो आपले काही वाकडे करु शकत नाही. म्हणून मुजोरपणाने देवादेखत लोकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे काम ही मंडळी बिनबोभाटपणे करु शकतात. जनतेचे प्रातिनिधीक स्वरुपातले प्रतिनिधीसुध्दा केले त्याला भरावे लागेल अशी निरर्थक आशावादी विधाने करुन या प्रकारांकडे दुर्लक्ष करतात. पण जर केले त्याला भरावे लागले असते तर हजारो लोकांचे मुडदे पाडण्यात सहभागी असणाऱ्या दाऊद इब्राहीमला अख्खे आयुष्य सुखासमाधानात जगायला मिळाले नसते. कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोठे पुरस्कार मिळून कृतकृत्य होता आले नसते. जो लबाडी करतो त्याच्या विरोधात कायदा माननाऱ्यांनाच उठाव करावा लागणार आहे. करेल तो भरेल या नावाने सुजाण लोक शांत बसून राहीले तर या अपप्रवृत्तींचे दिवसेंदिवस फावणार आहे. कारण यांना पक्के कळून चुकलेले असते की असे काहीच भरावे लागत नाही.

सोमवार, १२ एप्रिल, २०१०

आपल्या घरी

कशाच्या शोधापायी
आज घर धूसर झाले?
हक्काची उब अन
मायेचे हात धूसर झाले,
जिंदगी उजळण्यासाठी
 दिवे शोधत राहिलो
उजेडाने दिपली नजर
 अन घर धूसर झाले.

किती सुखात असतो जर आपल्या घरी असतो,
आपल्याच ढंगात असतो जर आपल्या घरी असतो.

निस्तब्ध हवा या इथे हा घसा कोरडा पडलेला,
गार पाणी प्यालो असतो जर आपल्या घरी असतो.

चंद्राचे तारकांमधून चालले शेखी मिरवणे,
चांदण्यात न्हालो असतो जर आपल्या घरी असतो.

झाकोळ अचानक आभाळी हे विजेचे कडाडणे,
असे कधी थरथरलो नसतो जर आपल्या घरी असतो.

वादळलेल्या या वळणावर वास खमंग पोट पोरके,
पोट भरून जेवलो असतो जर आपल्या घरी असतो.
000