घाव अजुनी...

दूनियादारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दूनियादारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २० एप्रिल, २०१६

तांबूस...

त्याच्या पसंतीच्या मुलीशी
त्याचं नवीनच लग्न झालं होतं तेव्हाची गोष्ट..
.
नव्या जोडप्याचं जिथेतिथे कौतुक..
म्हणून हा बऱ्याच लग्नांमध्ये
कौतुकाने तिला सोबत घेऊन जायचा..
.
नंतर नंतर
घरी आल्यावरी ती
तिच्या बहीणींशी, मैत्रिणींशी
नुकत्याच लावून आलेल्या लग्नाबद्दल
फोनवर बोलायची..
.
तिकडून प्रश्न यायचा,
"कसा होता गं नवरा मुलगा..?"
.
मग ही लगेच उत्तर द्यायची,
"छान होता गं.. गोराप्पान होता अगदी..!"
.
ह्याच्या कानावर हे शब्द पडले की
आगतिकतेच्या ज्वाळांनी
त्याची कानशीलं तापायची..
.
‘कमावलेल्या डिग्र्या..
प्रतिष्ठेची नोकरी..
महिन्याचा तगडा पगार..
वर्तुळातलं नाव..
हे सगळं
भस्म होऊन जावं क्षणार्धात...
.
नि त्या बदल्यात
माझी त्वचा थोडी उजळ व्हावी’
.
असले काहीबाही विचार
त्याच्या मनात यायचे..
.
एक दिवस .
त्यानं मला मनातली सल सांगितली..
.
मी म्हटलो..
“येडझव्या..
गोरी पोरगी शोधता शोधता
पन्नास गावं पालथी घातलीस..
पाचपंचवीस जणींना
निव्वळ गव्हाळ नि सावळ्या रंगावरून
नकाराचं गालबोट लावून आलास..
.
तेव्हा त्या प्रत्येक प्रसंगी
त्या जीवाच्या मनात काय घालमेल होत असेल
हे कळतंय ना आता..!
तेव्हा
त्या पोरींचं ज्ञान नि पदव्या
सोयीस्कर नजरेआड केल्यास..
आता पदरात पडलेलं
अगाध ज्ञान नि
शुन्य परिघ असलेलं वर्तुळ
भोग चुपचाप...’
..
माझ्या बोलण्यामुळे
त्याचा चेहरा मग बऱ्यापैकी तांबूस झाला..
***

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

कट्टर...

अंगभर..
काळा बुरखा पांघरून..
काळ्याभोर भिरभिरत्या डोळ्यांनी
अन् लांबसडक गो-यापान बोटांनी
त्या पोरी रंगीत कपड्यांच्या
सगळ्या छटा पारखत असतात...
.
परंपरांचा पोलिओ झालेला
तरणाबांड समाज
युरोपियन मासिकातल्या सुंदर
नायिकांची चित्रे
न्याहाळत असतो....
.
कट्टर रंगाचा प्रोफाईल
फोटो लावून
याची त्याची आयभैन एक करतांना
तो अधून मधून
अॉस्ट्रेलियन तरूणीने
त्याची रिक्वैस्ट अक्सेप्ट
केलीय का.. ते तपासत असतो..
***

एकंदरीत...

हिरव्यागार झाडावर
सरळ कु-हाड चालवू नये...
अशावेळी फार हल्लकल्लोळ माजतो..
आणि तुम्ही निर्दयी खलनायक दिसू लागता...
.
त्यापेक्षा
विषाची चारदोन इंजेक्शन्स द्यावीत टोचून..
हळूवार..
मग ते महाकाय झाड पोखरलं जातं आतून...
निष्पर्ण ... उजाड होतं...
कधीही कोसळण्याच्या बेतात येतं...
.
मग करावेत करवतीने त्याचे तुकडे तुकडे..
अशावेळी तुम्ही
सालस नि जागरूक समाजसेवक दिसता..
.
‪#‎एकंदरीत‬..
चोरटा स्पर्श करून
विनयभंग करण्यापेक्षा
मायेने गालगुच्चा घेऊन हौस भागवून घेणं
केव्हाही श्रेयस्करच...


***

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

व्यवहार

जिथे तिथे मी ही असे तोट्याचे व्यवहार केले
तुझ्यापासून दूर झाले नि दोनाचे चार केले....

तू दिलेल्या नकाराचा सूड असा घेतला मी
देणेघेणे नसते तिथे प्रेम अपरंपार केले...

प्राक्तनावर चरफडून मी हात दुसऱ्या हाती दिला
त्यानेही कहर केला, प्रेम मजवर फार केले....

तुझ्या लाघवी प्रेमाने सदैव धडकी भरते उरी
कितिक खुडल्या कळ्या मी कित्येक अंकूर ठार केले...

तुझी जन्माची वैरीण मी अन् तू ही असा खलनायक
कधीच कळले नाही परंतु कोणी अत्याचार केले...

मी, माझा संसार, पिल्ले, घरटे आता काटेकोर
तुला अज्ञात वाटेवरती मी या घराचे दार केले....
***

हाक

लावणी मादक असते घरच्या गाण्याहून
बरसात पोषक असते भरल्या पाण्याहून...

कणगी भरुन असता उपवास पचून जातो
ती भूक दाहक नसते सरल्या दाण्याहून...

ढेकूळ फुटल्यावर ओढा गढूळ वाहतो
मग सपान नितळ फुलते पळत्या पाण्याहून...

लेक सासुराशी बापाचे संचित नेते
उजळ काहीही नसते असल्या सोन्याहून...

हाक थांबली बिनवाटेच्या गावाकडची
मरण त्याचे परवडले फसव्या जाण्याहून...

***

बुधवार, २२ जुलै, २०१५

तुझ्या पदराआड...

तुझ्या पदराआड सुसाट जेव्हा शिरतो
बनते सर्वज्ञ योगी दिवानगी माझी...
 
तुझ्या पदराआड उगाच जेव्हा हरतो
शत्रुस फितुर असते परवानगी माझी...

तुझ्या पदराआड ढसास जेव्हा रडतो
तेव्हा मला गवसते मर्दानगी माझी...

तुझ्या पदराआड असाच जेव्हा लपतो
कुशीत आईच्या मग रवानगी माझी...

***

सोमवार, १५ जून, २०१५

ढग...

अमुक तमुक विद्यालयाची
१००टक्के निकालाची परंपरा सलग १० व्या वर्षी कायम...
.
दणकट रूबाबदार
संस्थाचालक कम मुख्याध्यापकांच्या
फोटो शेजारची जाडजुड अक्षरं तिने वाचली...
.
पोस्टर मधल्या तिच्या चिमण्या मैत्रिणी
वाटत होत्या परक्या..
.
कालपासुन एकाच विचारानं
तिचा जीव पाणी पाणी व्हायचा....
.
जर आपल्याला गणितात
दोन मार्क कमी पडले असते तर....
.
पुन्हा तिच्या मनात कालवाकालव झाली...
हातातलं गुणपत्रक
पून्हा पाहीलं तिनं नजर भरून..
.
गणित विषयाच्या रकान्यातल्या
३५ मार्कांवर पुन्हा दाटले ढग...

****

शनिवार, १६ मे, २०१५

पडदा...

तू भेटशील तेव्हा..

माझ्या अंगप्रत्यांगातून
जागणाऱ्या

तुझ्या अस्तित्वाच्या
खाणाखुणांची अडगळ

मी झाकून टाकीन
एक बऱ्यापैकी
हलक्या रंगाचा
पडदा लावून...

आणि त्यावर
चिकटवून देईन

माझ्या नवऱ्यासोबतचा
माझा
एकूलता एक हसरा फोटो...

आणि मग
आताही तुला
नाहीच कळणार
पडद्यामागे काय चाल्लंय ते!

****

घाव बसला...

घाव बसला भाकरीचा...
डाव जमला चाकरीचा...

डिग-या मज पुसती पुन्हा...
भाव किती रं नोकरीचा...

यार पहाडी ढासळला...
डाव डसला छोकरीचा...

जहर कडवट प्यालो जरी...
महाल केला साखरीचा...

नांग्या फुटल्या मेंदूला...
रस्ता झाला ठोकरीचा...


***

नंतर...

अचानक तुझी
चप्पल तुटली रस्त्यातच...
आणि
लगेचच सापडावी
एखादी सेफ्टी पिन!
.
तसा भेटलो मी तुला...
.
कित्ती खुश झाली होतीस तू..
आणि
मी ही गेलो होतो हरखून..
उगाचच !
.
कसला धांदरट होतो ना मी!!!
.
हम्मम्....
.
नंतर तू चपलांचा
नवा कोरा जोड विकत घेतलास...

******

जर.. तर...

काळजाचा अता पत्थर करते...
अन् रस्ता तुझा हा खडतर करते...
.
वाट अशी का.. ही चुकू पहाते...?
नि घाट जीण्याचा दुस्तर करते...
.
हेवा तुला.. माझ्या कुंकवाचा...
मी तुझ्या मळ्याचा मत्सर करते...
.
अवघडलेले.. हे रंग दडवण्या...
या अजाणतेचे.. अस्तर करते...
.
पतंग म्हणतो.. भस्म होऊ दे...
पण ज्योत ही उगा.. जर तर करते..


****

भर दूपारी....

आणि भर दूपारी
शेठ यायचे गोणी घेऊन..
तांबूस चेह-यावरचा
घाम पूसत
सगळे चणे फुटाणे पसरवून
द्यायचे चौकात...
मग कबुतरांचा
झेपावणारा थवा बघतांना
हरखुन जायचे...
शेठ जवळ
एक लांब काठीही होती..
चणे गोळा करून
अधाशीपणे खाणा-या
क्रूर हडकुळ्या पोरांना
हूसकावून लावण्यासाठी....

***

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या संदर्भात....

शाळेत असतांना सुटी असली की आईवडीलांना पत्ता लागू न देता मित्रांसोबत दूर रानात भटकायला जायचो. कधी कधी शाळा चुकवूनही हे उद्योग केल्याचे आठवते. यात एक धाडस वाटायचे. (पण तेव्हा आईवडीलांच्या धाकापूढे ह्या धाडसाची लगेच वाफ व्हाययी.) या भटकण्यात जिज्ञासा शमवणा-य़ा नको त्या (?) उद्योगांपासून उधाणणा-या ओढ्यात पोहायचा प्रयत्न करणे, आंब्याच्या झाडावर जीवघेण्या उंचीपर्यंत जाऊन आंब्याचा उरलासुरला पाड शोधणे... क्वचित बिड्या फुंकणे असले उद्योग करायचो...( या पैकी काही उद्योगांमधली थोडीशी ही चुक आम्हा भावंडांची संख्या एक ने कमी करायला पूरेशी होती... पण तेव्हा ते कुठे कळत होते.) आज त्याचे स्वतःलाच कौतुक वाटते. पण यापोटी पाठ शेकायची वेळ येईपर्यंत मारही खाल्लेला आहे.. तेव्हा फार पाचव्या सहाव्या वर्गात असेन....... आज काळाच्या संदर्भात तेव्हा ते तितकेच गंभीर असावे आणि आजचे तितकेच क्षुल्लक असे वाटते.... बाकी तावातावाने पोराबाळांच्या काळजीतून लिहीणे हा जनरेशन ग्याप म्हणावा का... (तरीही आज तालुक्याच्या गावी असला प्रकार निदान शाळेतल्या मुलांच्या बाबतीत तरी होत नाही हे ही नमुद करायला हवे...)






***

गुरुवार, ७ जून, २०१२

मुलगी हवी पण....


भारतात स्रीभ्रूण हत्या वगैरे या विषयावर बरीच लोक अतिशय संवेदनशीलतेने मते मांडत आहेत. पण ही मुलगी शेजा-याच्या घरात हवी आपल्या नव्हे याकडेच बहूतेकांचा कल असतो.

माझ्या या मताशी असहमत असलेले लोक
१. ज्यांना अजून मूलबाळ झालेले नाही. (नवविवाहित)
२. जे या भूमिकेतून (मूल जन्माला घालण्याच्या) बाहेर पडलेले आहेत.
३. ज्यांना आधीच एक मुलगा झालेला आहे व अजून मुल हवे आहे.

बाकी ज्यांना आधीच एक मुलगी झालेली आहे त्यापैकी एकाचे हे मत पूरेसे प्रातिनिधीक ठरते.
"आम्ही समाजाला एक मुलगी दिली आहे मग आता आम्ही मुलाची अपेक्षा केलेली काय वाईट? मुला-मुलींचा रेशो संभाळायचा ठेका काय आम्हीच घेतला आहे का?"

गर्भलिंगचाचणी साठी येणा-या महिलेच्या सोबत तिची लाडकी मुलगी हमखास असते...

आता बोला.
(या सर्वातून भ्रुणहत्येच्या कुप्रथेचे समर्थन करणे हा उद्देश अजिबात नाही)




ooo

































रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

पाण्याच्या बदलत्या रचनेची भाकडकथा ?

नळाला येणारे पाणी, तळ्यातून येणारे पाणी यातील रचना त्यातील प्रचंड दबावामूळे बदलते (म्हणजे H2O चे 2OH किंवा O2H )आणि मग हे पाणी शरीरात शोषण्यालायक फारच कमी प्रमाणात राहते. म्हणजे योग्यप्रकारे रचना असलेले पाणी शरीरात शंभर टक्के शोषले जात असेल तर असे कल्चर्ड किंवा संस्कारीत पाणी १०० टक्के शोषले जाते.  अशा संस्कारीत पाण्याच्या नेहमी प्राशनामुळे बहिरेपणा, गुढगेदूखी, मानसिक ताणतणाव आदी प्रश्न चुटकीसरशी सुटतात.

हे संस्कारीत पाणी मिळवायचे कुठून? सोपे आहे. पंधरा हजाराच्या आसपास एक काचेची डिस्क (साधीसुधी नाही तर नासा आपल्या अंतराळात जो काच वापरते त्या काचेपासून बनलेली ) विकत घ्यायची आणि त्यावरून आपले कुठलेही पाणी पसार केले (?) की झाले त्याचे संस्कारीत पाणी तयार..

असे हे संस्कारीत पाणी सामान्य पाण्यापेक्षा दाहा ते पंधरा मिनिटे लवकर तापते. याची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता साध्या पाण्यापेक्षा  जास्त असते. फार पूर्वी ही विशिष्ट झऱ्याचे पाणी वापरून असाध्य रोग बरे झाल्याची उदाहरणे वानगीदाखल आहेतच. आज मात्र या संस्कारीत पाण्याचे स्प्रे सुद्धा मिळतात.  कुणाला पाहीजे असतील तर अमुक अमुक क्रमांकावर संपर्क करा.

मंडळी ही कुठली जाहिरात नाही. (नजर रक्षा कवच किंवा महालक्ष्मी टाईप यंत्राची ) हा आहे आपल्या लाडक्या पूरोगामी चित्रलेखातल्या चालू   ;)  अंकातला मुखपृष्ठ लेख. असू द्या. एवढे अक्षरशः पाण्यासारखे पैसे खर्च करून मानवकल्याणाच्या योजना, आरोग्य सुविधा सरकार करते आहे. त्यापेक्षा पाण्यानेच तेही एका काचेच्या चकतीवरून पसार झालेल्या (की केलेल्या) जर इतके प्रश्न सुटत असतील तर त्याची जाहिरात ही व्हायलाच हवी.

पण या सारांशावरून तुमच्या मनात काही प्रश्नांचे काहूर माजले का?  मग त्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. ती या संस्कारीत पाण्याच्या समर्थकांनी द्यायला हवीत. पण या लेखात एक मजेशीर वाक्य आहे.

आम्ही या पाण्याची कुणावरही सक्ती करत नाही. कारण मनोभावे वापरले तरच या पाण्याचा उपयोग होतो. शंकाखोरांच्या पदरी फारसे काही पडत नाही. 

म्हणजे हे झाले मारुतीच्या बेंबीतल्या गार वाटणाऱ्या विंचवासारखेच.

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

वरुणयंत्र

डॉ.राजा मराठे यांनी तयार केलेल्या वरुणयंत्राचे प्रयोग सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सुरू आहे. सकाळ या वृत्तपत्राने या प्रयोगाच्या प्रचार व प्रसाराल अग्रक्रम दिल्याचेही दिसून येते आहे. (इतर वृत्तपत्रांना मात्र याचे वावडे असल्यासारखे वाटते). आयआयटी चे पदवीधर असलेले मराठे यांनी हे यंत्र विकसित केले आहे. हवेची विशिष्ट आर्द्रता, आकाशातील ढगांचे प्रमाण यांचा मेळ जुळला की या वरुण यंत्राच्या साहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे (ढगांचे) सांद्रीभवन होण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्प्रेरकाचा पूरवठा झाला की चोवीस तासात पाऊस पडतो असा मराठे यांचा दावा आहे. उत्प्रेरक म्हणून मिठाचे कण हवेत पोचवण्यासाठी भूस्सा, लाकडे, कचरा यांची होळी करून त्यात मीठ टाकले की ते ढगांपर्यंत पोहोचते अशी या प्रयोगाची संकल्पना आहे.  असो.

या प्रयोगाबद्दल जिज्ञासू व विज्ञानाबद्दल, पर्यावरणशास्र, हवामानशास्र यांतील तज्ज्ञ लोकांनी अजूनपर्यंत अनुकूल किंवा प्रतिकूल अशी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सकाळने मात्र वरुणयंत्राच्या प्रयोगानंतर (किंवा प्रयोग सुरू असतांच) पाऊस . (हा पाऊस चोवीस तासांनी पडतो की चोवीस तासात या बद्दल स्पष्टीकरण सापडत नाही ) अशा आकर्षक जाहिरात वजा बातम्यांचा मारा सुरू ठेवला आहे. अर्थात चांगल्या गोष्टीची जाहिरात व्हायला हवीच. पण सततच्या जाहिरातींनी एखादी गोष्ट चांगली वाटायला लागते हे ही लक्षात घेतले पाहिजे.

मिठाचा असा उत्प्रेरक म्हणून वापर करुन खरेच ढगातील वाफेचे पावसाच्या थेंबात रुपांतर होण्यचा वेग वाढवता येतो का? माझ्या माहिती प्रमाणे तर वाफेचे पाण्यात रुपांतर होण्याची क्रिया ही भौतिक क्रिया आहे. अशा भौतिक क्रियांमध्ये उत्प्रेरक वगैरे असते का याबद्दल मी जरा अज्ञानीच आहे.

वर सांगितल्या प्रमाणे हवेतील आर्द्रता आणि ढगांचे प्रमाण यांचा अपेक्षित मेळ जमला की हा प्रयोग करता येतो. आणि मग चोवीस तासात पाऊस पडतो. पण असा मेळ जमणे हे निव्वळ नैसर्गिकरित्याच फक्त होऊ शकते. आणि असे घडून आल्यावर आपसूकच पाऊस पडत नाही काय. किंवा पाऊस पडण्याच्या शक्यतेची टक्केवारी वाढत नाही काय.

कुठल्याही कामामागे कोणाचा हातभार व सहभाग आहे या वरुन कामाची किंमत कमी किंवा जास्त मानन्याची एक जून खोड काही जणांना असते. खरे तर ह्या कामाच्या उपयोगितेतली व यशातली वैश्विकता हा निकष कामाची प्रत ठरवण्यासाठी वापरला जावा. वरुण यंत्रावरची एक मजेशीर प्रतिक्रीया वाचनात आल्याने हे लिहीले आहे.

ती प्रतिक्रिया अशी -श्री. मराठेसाहेब नमस्कार, आपण एकप्रकारे होम करून पाऊस पाडण्याचा प्रयोग केला आहे. हेचकाम आपण वीज निर्मिती केंद्रात चिमणी मध्ये ढगाळ वातावरण असताना मीठ टाकून कमी खर्चात आणि जास्त प्रमाणात करू शकतो असे मला वाटते. हा प्रयोग सरकारी मदत घेऊन करावा लागेल. कितपत जमेल याबद्दल शंका आहे. आपण सर्व प्रयोगकर्ते चित्पावन ब्राम्हण आहात याचे मला कौतुक वाटते .

असो वरुणयंत्राचा मंत्रालयातही प्रयोग झाल्याचे वाचनात आले आहे. जर हे प्रकरण खरेच मानवजातीच्या इतक्या उपयोगाचे असेल तर यावर लगेच सरकारने पाडताळणीसाठी तज्ज्ञांची समिती नेमायला हवी.

शुक्रवार, ११ जून, २०१०

जनगणनेत जात?

भारत सरकारच्या वतीने देशव्यापी जनगणनेचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी असलेल्या भारतात होऊ घातलेली ही जनगणना अर्थातच अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्यक्ष जनगणनेला अद्याप सुरुवात व्हायची आहे. ही जनगणना जातीनिहाय व्हावी की नाही याविषयी सध्या मतमतांतरे आहेत. जात हा भारतीय समाजव्यवस्थेवरील कलंक असल्याचे काहींचे मत आहे. पण जात हे भारतीय समाजव्यवस्थेचे एक अभिन्न अंग असल्याचे जातीव्यवस्थेवरच्या टिकाकारांनाही मान्य करावे लागते. आज भारतात सर्वच जातींची रचना ही उतरंडीप्रमाणे आहे. जातीत सामाजिकदृष्ट्या उच्चनीचता असल्याने ज्या जाती नीच मानल्या गेल्या त्या सामाजिक तसेच शैक्षणिक, सांपत्तिक व तत्सम बाबींमध्ये मागासलेल्या राहिल्या. उच्च मानल्या गेलेल्या जातींना सहज संधी उपलब्ध असल्याने त्यांचा वरील बाबतीत विकास झाला. हे सगळे सरसकटपणे झाले असे म्हणता येत नाही पण बहूतांशी असे झाले. हाच निकष प्रमाण मानून मागास जातींचे मागासलेपणाच्या बाबतीत वेगवेगळे वर्ग प्रवर्ग तयार केले गेले. (यात जी जात सामाजिकदृष्ट्या सर्वात खालच्या स्तरावर होती तिचा समावेश अर्थातच जास्त प्रमाणात मागासलेली जात अशा प्रवर्गात समावेश केला गेला. उदा. विशेष मागासप्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती इ.) या सगळया मांडणीत ज्या जाती सांपत्तिक व शैक्षणिकदृष्ट्या खरे तर मागास नव्हत्या पण जातीच्या उतरंडीत त्यांचे स्थान खाली होते त्यांचीही रवानगी एकाच न्यायाने मागासवर्गात करण्यात आली. (उदा. सोनार, गुरव, वाणी, माळी यांना ओबीसीत तर राजपूत लोकांना भटक्या विमुक्त जातीत टाकण्यात आले.) ज्या जाती खरे तर सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या सरसकट सुधारलेल्या नव्हत्या त्यांचा समावेश सामाजिकदृष्ट्या उच्च जातीचे असल्याने खुल्या प्रवर्गात झाला. (उदा. कुणबी, मराठा, मुसलमान) या सगळ्यांसाठी १९३० सालची म्हणजे जवळपास ऐंशी वर्षापूर्वीची जातीनिहाय झालेली जनगणना आधारभूत मानन्यात आली. आज नव्याने या मागासवर्गातील लोकांची संख्या माहित व्हावी म्हणून जातिनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. या मागणीला विरोधही होत आहे. सध्याच्या माझ्या माहितीनुसार जातिनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ खालील मुद्दे मांडले जातात.
१. कोट्यावधी रुपयांचा निधी मागास जातींच्या विकासासाठी आज खर्च केला जातो. अनेक योजना सोयी, सवलतींची आखणी व अंमलबजावणी केली जाते. हे सगळे ऐंशी वर्षापूर्वीची जनगणना आधारभूत मानून केले जाणे योग्य नाही.
२. जातनिहाय जनगणनेमूळे त्या त्या जातीची खरीखुरी लोकसंख्या पूढे येईल आणि अल्पसंख्य, बहूसंख्य म्हणून जे राजकारण चालते ते बदलेल. ( खरे म्हणजे हे राजकारण चालूच राहील फक्त बदलेल कारण नव्याने हाती आलेल्या आकड्यात काही बहूसंख्य व काही अल्पसंख्य जाती असतीलच)
जातिनिहाय जनगणनेचा विरोध करतांना खालील मुद्दे मांडले जातात.
१. अशा जनगणनेमुळे जातीजातीतला दूरावा वाढेल. बहूसंख्य अल्पसंख्य असे वाद सुरु होतील.
२. जातीभेद निर्मुलनाच्या चळवळीचा आजपर्यंतचा प्रवास उलट्या दिशेने सुरु होईल.
वरील मुद्यांमध्ये अजून बरीच भर पडू शकते. पण या सगळ्यात जर जातीनिहाय जनगणनेचा निर्णय झालाच तर मागास असण्यानसण्याचा आणि विशिष्ट जातीचा असण्याचा कितपत संबंध सध्याच्या काळात आहे याविषयी संदेह वाटतो. जनगणनेतून हाती आलेल्या जातींना त्यांच्या जातींच्याच आधारावर (त्यांच्या मागास असण्यानसण्याचा विचार न करता ) जर सोयी सवलती दिल्या जाणार असतील तर ते कितपत योग्य ठरेल हा ही मोठा प्रश्न आहे.
एकूणच जनगणना जातिनिहाय असावी का? असावी तर का? नसावी तर का?
(जनगणना फॉर्म मधल्या सध्याच्या प्रश्नावलीवरुन तरी एखादे कुटुंब मागास की प्रगत हे निर्विवादपणे स्पष्ट होते असे दिसते. मग तरीही जात का असाही एक प्रश्न मनास पडतो.)

गुरुवार, २० मे, २०१०

शिक्षणाचा मूलभूत हक्क की कारस्थान ?

एखादी चांगली गोष्ट घडत असली की काहीतरी कुजक्या शंका काढून त्यात खोडा घालायची सवय काही महाभागांना असते. अर्थात ज्याचा त्याचा विचार करण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्याने मला तरी वाटते की अशा शंकासुरांचा मूळ बाब निर्दोष ठरण्याला बऱ्याचदा उपयोग होतो. कधीकधी सामोऱ्या न आलेल्या बाजू अचानक दृष्टीक्षेपात येतात.

केंद्रशासनाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार माननारे ऐतिहासिक वगैरे असे एक विधेयक सध्या मंजूर केले आहे. ज्यामूळे शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत अधिकारात समावेश झाला आहे. महाराष्ट्राने आपला पूरोगामीपणा दाखवत (की मिरवत) हे विधेयक तात्काळ राज्यात लागू केले आहे. यानुसार नुकत्याच राज्यशासनाने काढलेल्या अधिसुचनेनुसार आता इयत्ता आठवीपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला अनुउत्तीर्ण करता येणार नाही. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या वार्षिक परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नापास घोषित केले असेल त्यांना पूढच्या वर्गात प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असो.

तर शंका अशी की विद्यार्थ्याचा घरी करवून घ्यावयाचा अभ्यास ही जी काही शाळाबाह्य संकल्पना आहे ती फक्त संख्येने अतिशय मर्यादित असणाऱ्या मध्यमवर्गाबाबतीत अवलंबली जाणारी बाब आहे. महाराष्ट्रातच नव्हे देशभरात मुलाचा गृहपाठ घरी करुन घेणे तर सोडाच पण त्याने त्याच्या शाळेच्या वेळेत काळी केलेली पाने पाहण्यासही त्याच्या आईबापाला वेळ नसतो. हे घडून येते ते त्यांच्या गरीबीपायी किंवा अज्ञानापायी. नोकरदार व तत्सम मध्यमवर्गात मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायच्या वेळापत्रकाचे नियोजन आईवडीलांनी व्यवस्थितपणे पाळलेले दिसून येते. या सगळ्यातून एक बाब समोर येते की नापास करु न शकणाऱ्या भाबड्या शिक्षकाची इथून पूढे काडीचीही भीती न बाळगणारे मूल निदान आईवडीलांच्या गृहपाठाने तरी किमान ज्ञानाचे धडे गिरवत राहील. (शिक्षकाने विद्यार्थ्याला भीती दाखवलीच पाहीजे का? ही बाब इथे दूर्लक्षिली जरी गेली असली तरी पास होणे ही जबाबदारी मानूनच भाबडी मूले कष्ट करुन शिक्षकाला सहकार्य करीत असतात. आपणाला ज्ञान मिळवायचे आहे या भावनेतून शिकायचे असा विचार करण्याची त्यांची क्षमता असते का याची मला शंका आहे.)

या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिकणारे लाखो विद्यार्थी कोणत्या उद्दीष्टाला समोर ठेऊन ज्ञान संपादन करतील हा प्रश्नच आहे. शिक्षकांना (अपवाद क्षमस्व) आजपर्यंत ज्या पोरांच्या परीक्षा घेतल्या त्यांचे नियमानुसार पेपर तपासून त्यांना पास करता करता नाकीनऊ येत होते. ती पोरे आता विनासायास वरच्या वर्गात जात असतांना पाहून हायसे वाटेल. (विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या नव्या पद्धतींनी शिक्षकाची जबाबदारी निश्चित केली जाईल असे शासन म्हणते आहे हा एक दिलासा.) पोरगा पास झाला का याची तरी ग्रामीण भागात पूर्वी विचारणा होत होती आता त्याचीही सोय राहीली नाही. शिक्षणतज्ञांचे या विधेयकानंतर दर्जाबाबतचे मत पाहीले तर त्यांना मूल पहील्यांदा शाळेत आले व टिकले पाहीजे हे महत्त्वाचे वाटते. अनेक मुले आज शाळाबाह्य ठरली आहेत हे मान्य पण जी शाळेत येतात. नियमित अभ्यास करतात. एकेका मार्कासाठी शिक्षकांना भांडतात. अभिमानाने दरवर्षी गुणपत्रक मिरवतात त्यांना आता आपण अभ्यास कशासाठी करायचा ह्याचे काहीतरी संयुक्तीक कारण पटवून द्यावेच लागेल. अन्यथा सगळी मूले आठवी पास होतील आणि नववीत अर्धी व दहावीत अर्धी गळतील. ही सगळी गळती अर्थातच ग्रामीण भागातल्या मुलांची असेल. कारण आज फक्त ग्रामीण भागात औपचारीक शिक्षण हे शंभर टक्के शाळेवर अवलंबून आहे. पहीलीत घातलेल्या पोराची प्रगती कितपत झाली हे खेड्यापाड्यातल्या आईबापांना मुलगा दहावीत पास/नापास झाल्यावरच कळते. एरवी आजही फक्त परीक्षेला गैरहजर राहणारी मुलेच फक्त नाईलाजाने नापास केली जातात. आता तर गैरहजर राहीला तरी शिक्षक या विद्यार्थ्यांची मिनतवारी करुन त्याला पूढच्या वर्गात प्रवेश देणार आहेत. म्हणजे ग्रामीण भाग त्यातही ग्रामीण भागातल्या अशिक्षित, मोलमजुर, शेतकरी लोकांची पोरे फक्त आठवीपर्यंत शिकतिल आणि मग पुढचे सगळे मार्ग शहरी मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय मुलांच्या पाल्यासाठी मोकळे उरतील. आठवी पर्यंत सक्तीचे शिक्षण म्हणजे फक्त आठवीपर्यंतच शिक्षण असे होण्याचीच शक्यता जास्त वाटते. शिक्षणाचा अधिकार मूलभूत नसतांनाही लाखो मूले शिकत होतीच. शिक्षणाचा हक्क देण्याची भाषा करतांना आपण समाजाच्या मोठ्या भागाला फक्त प्राथमिक शिक्षणापूरते मर्यादीत करण्याच्या मोठ्या कटकारस्थानात तर सहभागी होत नाही नाही ना याचा ही या निमित्ताने विचार व्हायला हवा.




शुक्रवार, ७ मे, २०१०

आधूनिक लोकगीते?

महाराष्ट्रातील लोककलाप्रकारांत लोकगीते हा एक महत्त्वाचा भाग आहे. कुणीतरी अनामिक निर्माता असलेल्या या गीताचे सादरीकरण होता होता ते गीत जेव्हा साऱ्या समुहाचेच बनुन जाते तेव्हा त्याला लोकगीताचा दर्जा प्राप्त होतो. प्रसंगी लोकगीत ही समुहाची निर्मिती सुध्दा असते. आज महाराष्ट्रात लोकगीते म्हणून ज्या कॅसेट्स व सीडी प्रकाशित होत आहेत त्या गीतांकडे ही लोकगीतांची आधूनिक आवृत्ती म्हणून पहाता येते. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक लोकगीते एचएमव्हीच्या व आकाशवाणीच्या सहाय्याने घराघरात जाऊन पोहोचली व अजरामर झाली. त्यांची परंपरा नंतर पुढे आनंद व मिलिंद शिंदे यांनी काही प्रमाणात चालवली. काही प्रमाणात या साठी की आनंदमिलिंद यांनी नंतर लोकप्रियता व द्विअर्थी रचनांना जास्त महत्त्व दिले. खरे तर असे म्हणणे ही मलाच पून्हा एकांगी वाटते. आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या व त्यांच्या सोबत इतर समकालीन लोकगीत गाणाऱ्या गायकांची एकूण गीते पाहता त्यातल्या द्विअर्थी गाण्यांची संख्या मर्यादीतच आहे. परंतु या अशा द्विअर्थी गाण्यांना प्रसिद्धी मिळण्याचे प्रमाण मात्र अर्थातच जास्त आहे. अभिरुचीचे काही संकेत निर्माण करणारी व सर्वांवर ते संकेत लादू पाहणारी एकूणच व्यवस्था या व इतर गीतांकडे डोळेझाक जरी करत आली असली तरी जनमानसांवर या गीतांनी केलेली जादू मात्र नाकारता येणे शक्य नाही. जवा नवीन पोपट हा या गीताने आनंद शिंद्यांना प्रसिद्ध केले. हे गीत द्वीअर्थी नव्हते. त्यानंतर दरसाल एक तरी हीट गाणे देऊन त्यांनी आपला चाहता वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण केला. ज्या गीतांशिवाय अभिजनांच्याही लग्नाच्या वरातीला पूर्णत्व येऊ शकले नाही अशी गीते दरसाल प्रसिद्ध होणारी गीते आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेली आहेत. उदा.


हॅलो मी बाबूराव बोलतोय.
माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं.
हाताला धऱलया म्हणती लगीन ठरलंया

अशी अजूनही कित्येक गाणी लोकांच्या लक्षात असतील. आणि या गाण्यांना द्विअर्थी म्हणता येत नाही. अर्थात द्विअर्थी गाण्यांच्या बाबतीत आनंदमिलिंद शिंदे यांनी काही वेळा अगदी कहर केला आहे हे मात्र मान्य करावेच लागेल. प्रल्हाद शिंदे यांनी मात्र द्विअर्थी गाणी गायली नाहीत. त्यांच्या

कुठ जातील काळ्या पोरी
दिसते कोणाची गाडी
गोडीनं नांदाव लागंलं सखे
संसार माझा छान
कशाचं खरं खोटं पिकतय रं
सुय़ा घे गं दाभण घे
जीव लावा पोरीला माझ्या जावईबूवा

या आणि अशा कित्येक भावपूर्ण व सुरेल लोकगीतांच्या तुलनेत चल ग सखे पंढऱीला ही कॅसेट तुफान गाजली. कदाचित समाजमनावर असलेला भक्तीरसाचा पगडा व एचएमव्हीचे व्यवस्थित मार्केटींग या गोष्टी सुद्धा त्याला कारणीभूत असाव्यात. असो एकूण या टिपणात लोकगीतांच्या नावाखाली द्विअर्थी गाण्याची जी अभिरुचीहीन रेलचेल सध्या सुरु आहे तिचे समर्थन करण्याचा अजिबात उद्देश नाही. पण द्विअर्थी नसलेली आणि चाल आणि विशिष्ट ठेक्यावर ताल धऱायला लावणाऱ्या गाण्याच्या आस्वादापासून अभिरुची संभाळण्याच्या नादात कुणी दूर राहू नये असे वाटते. या निमित्ताने वाचकांनी आपल्या आठवणीतील काही या प्रकारची गाजलेली लोकगीते सांगावीत. या गाण्यांचे प्रकाशन जरी लोकगीते म्हणून होत असले तरी ती खरेच लोकगीते आहेत का यावरही अभ्यासूंनी अवश्य मत व्यक्त करावे. बाकी या गीतांच्या प्रसिद्धी मागच्या कारणांचीही चर्चा करता येईल.

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

वाईट करणाऱ्यांचे खरेच वाईट होते काय?


महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे. मंदीरातील अभिषेक बंद करण्यावरुन वाद घालणाऱ्या पुजारी आणि इतर संबंधित मंडळींचे हात दानपेटीतल्या भ्रष्टाचारात देखील प्रत्यक्षअप्रत्यक्षरीत्या गुंतलेले आहेत हे या निमित्ताने स्पष्ट झाले. मंदीरातील मुर्तीला अर्पण केल्या जाणाऱ्या साडीचोळीचा लिलाव होऊन ह्याच साड्या पुन्हा अव्वाच्या सव्वा किमतीला भक्तांच्या माथी मारल्या जातात हे सर्वांना माहित असेलच. पण तुळजाभवानीच्या दानपेटीतील दागिन्यांचा इतक्या पद्धतशीर पणे अपहार करुन गब्बर बननाऱ्यांचे हे कृत्य त्यांच्या अपूर्व धाडसाची प्रचीती देऊन जाते. ( इथे कुणाचे चारआणे किंवा एखादी पेन्सिल चोरली तर देव शिक्षा देईल याचा आम्हाला भयंकर धाक असतो.) तुळजाभवानीच्या गुप्तदानपेटीत भाविक जो पैसा व दागिने टाकतात त्याचा दरमहा लिलाव करण्याची पद्धत आहे. या लिलावात फक्त ठराविक लोकांनाच भाग घेता येईल याची व्यवस्था केली गेलेली आहे. या लिलावाच्या मूळ बोली रक्कमेत व लिलावात भाग घेण्याच्या शुल्कात गेल्या दहा पंधरा वर्षात अवघ्या काही हजारांची वाढ झालेली आहे. आणि या शुल्काचा फक्त काही हिस्सा घेऊन अनेकांना लिलावात भाग घेऊ देण्याचे औदार्य अनेकवेळा दाखवण्यात आलेले आहे. आणि जे काही शुल्क घेतले त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. गेल्या दहा ते बारा वर्षापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष व धर्मादाय आयुक्तांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्याच्या नियमालाही तिलांजली दिली गेली. हे सगळे आपल्या उपस्थितीत व्हायला हवे याची तत्कालीन जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त यांना माहित नसण्याचीच शक्यता आहे किंवा हेतूपूरस्सर त्यांना त्याकडे दुर्लक्ष केले असणेही शक्य आहे. या सगळ्या लबाड साखळीत अनियमितपणा निर्माण झाल्यामुळे म्हणा की काही अन्य कारणामूळे म्हणा या सर्व प्रकाराबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. धर्मादाय आयुक्तांनी दानपेटीत जमा होणाऱ्या देणगीची सरासरी काढण्याच्या उद्देशाने एक महिन्याच्या अंतराने दानपेटी उघडली तेव्हा त्यात तब्बल बावीस लाख रुपये रोख, त्रेचाळीस तोळे सोन्याचे दागिने व साडेपाचकिलो चांदीच्या वस्तू आढळून आल्या. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षातील लिलावाची माहिती प्रशासनाला देतांना संबंधितांकडे दहा वर्षात सेहेचाळीस ग्राम सोने व अर्धा कीलो चांदी इतकेच दान जमा झाल्याची माहिती दिली होती. एकंदरीत लोकांच्या श्रद्धाभावनेचा (!) गैरफायदा घेऊन लिलावात सहभागी लोकांनी वर्षानुवर्ष स्वतःचे उखळ पांढरे करुन घेतले. लोकांच्या श्रद्धेशी खेळू नका असे म्हणत मूर्तीची झीज होत असल्याचा अहवाल असतांनाही अभिषेकांवरच्या बंदीला विरोध केला. या सर्वात त्यांना भवानीच्या कोपाची भीती कशी वाटली नाही याचा विचार भोळीभाबडी जनता आता करत असेल. पण या लोकांना नक्की माहित असते की आपल्या समोर जो मांडला आहे तो फक्त दगड आणि तो आपले काही वाकडे करु शकत नाही. म्हणून मुजोरपणाने देवादेखत लोकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे काम ही मंडळी बिनबोभाटपणे करु शकतात. जनतेचे प्रातिनिधीक स्वरुपातले प्रतिनिधीसुध्दा केले त्याला भरावे लागेल अशी निरर्थक आशावादी विधाने करुन या प्रकारांकडे दुर्लक्ष करतात. पण जर केले त्याला भरावे लागले असते तर हजारो लोकांचे मुडदे पाडण्यात सहभागी असणाऱ्या दाऊद इब्राहीमला अख्खे आयुष्य सुखासमाधानात जगायला मिळाले नसते. कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोठे पुरस्कार मिळून कृतकृत्य होता आले नसते. जो लबाडी करतो त्याच्या विरोधात कायदा माननाऱ्यांनाच उठाव करावा लागणार आहे. करेल तो भरेल या नावाने सुजाण लोक शांत बसून राहीले तर या अपप्रवृत्तींचे दिवसेंदिवस फावणार आहे. कारण यांना पक्के कळून चुकलेले असते की असे काहीच भरावे लागत नाही.