घाव अजुनी...

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

पाण्याच्या बदलत्या रचनेची भाकडकथा ?

नळाला येणारे पाणी, तळ्यातून येणारे पाणी यातील रचना त्यातील प्रचंड दबावामूळे बदलते (म्हणजे H2O चे 2OH किंवा O2H )आणि मग हे पाणी शरीरात शोषण्यालायक फारच कमी प्रमाणात राहते. म्हणजे योग्यप्रकारे रचना असलेले पाणी शरीरात शंभर टक्के शोषले जात असेल तर असे कल्चर्ड किंवा संस्कारीत पाणी १०० टक्के शोषले जाते.  अशा संस्कारीत पाण्याच्या नेहमी प्राशनामुळे बहिरेपणा, गुढगेदूखी, मानसिक ताणतणाव आदी प्रश्न चुटकीसरशी सुटतात.

हे संस्कारीत पाणी मिळवायचे कुठून? सोपे आहे. पंधरा हजाराच्या आसपास एक काचेची डिस्क (साधीसुधी नाही तर नासा आपल्या अंतराळात जो काच वापरते त्या काचेपासून बनलेली ) विकत घ्यायची आणि त्यावरून आपले कुठलेही पाणी पसार केले (?) की झाले त्याचे संस्कारीत पाणी तयार..

असे हे संस्कारीत पाणी सामान्य पाण्यापेक्षा दाहा ते पंधरा मिनिटे लवकर तापते. याची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता साध्या पाण्यापेक्षा  जास्त असते. फार पूर्वी ही विशिष्ट झऱ्याचे पाणी वापरून असाध्य रोग बरे झाल्याची उदाहरणे वानगीदाखल आहेतच. आज मात्र या संस्कारीत पाण्याचे स्प्रे सुद्धा मिळतात.  कुणाला पाहीजे असतील तर अमुक अमुक क्रमांकावर संपर्क करा.

मंडळी ही कुठली जाहिरात नाही. (नजर रक्षा कवच किंवा महालक्ष्मी टाईप यंत्राची ) हा आहे आपल्या लाडक्या पूरोगामी चित्रलेखातल्या चालू   ;)  अंकातला मुखपृष्ठ लेख. असू द्या. एवढे अक्षरशः पाण्यासारखे पैसे खर्च करून मानवकल्याणाच्या योजना, आरोग्य सुविधा सरकार करते आहे. त्यापेक्षा पाण्यानेच तेही एका काचेच्या चकतीवरून पसार झालेल्या (की केलेल्या) जर इतके प्रश्न सुटत असतील तर त्याची जाहिरात ही व्हायलाच हवी.

पण या सारांशावरून तुमच्या मनात काही प्रश्नांचे काहूर माजले का?  मग त्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. ती या संस्कारीत पाण्याच्या समर्थकांनी द्यायला हवीत. पण या लेखात एक मजेशीर वाक्य आहे.

आम्ही या पाण्याची कुणावरही सक्ती करत नाही. कारण मनोभावे वापरले तरच या पाण्याचा उपयोग होतो. शंकाखोरांच्या पदरी फारसे काही पडत नाही. 

म्हणजे हे झाले मारुतीच्या बेंबीतल्या गार वाटणाऱ्या विंचवासारखेच.

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

वरुणयंत्र

डॉ.राजा मराठे यांनी तयार केलेल्या वरुणयंत्राचे प्रयोग सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सुरू आहे. सकाळ या वृत्तपत्राने या प्रयोगाच्या प्रचार व प्रसाराल अग्रक्रम दिल्याचेही दिसून येते आहे. (इतर वृत्तपत्रांना मात्र याचे वावडे असल्यासारखे वाटते). आयआयटी चे पदवीधर असलेले मराठे यांनी हे यंत्र विकसित केले आहे. हवेची विशिष्ट आर्द्रता, आकाशातील ढगांचे प्रमाण यांचा मेळ जुळला की या वरुण यंत्राच्या साहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे (ढगांचे) सांद्रीभवन होण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्प्रेरकाचा पूरवठा झाला की चोवीस तासात पाऊस पडतो असा मराठे यांचा दावा आहे. उत्प्रेरक म्हणून मिठाचे कण हवेत पोचवण्यासाठी भूस्सा, लाकडे, कचरा यांची होळी करून त्यात मीठ टाकले की ते ढगांपर्यंत पोहोचते अशी या प्रयोगाची संकल्पना आहे.  असो.

या प्रयोगाबद्दल जिज्ञासू व विज्ञानाबद्दल, पर्यावरणशास्र, हवामानशास्र यांतील तज्ज्ञ लोकांनी अजूनपर्यंत अनुकूल किंवा प्रतिकूल अशी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सकाळने मात्र वरुणयंत्राच्या प्रयोगानंतर (किंवा प्रयोग सुरू असतांच) पाऊस . (हा पाऊस चोवीस तासांनी पडतो की चोवीस तासात या बद्दल स्पष्टीकरण सापडत नाही ) अशा आकर्षक जाहिरात वजा बातम्यांचा मारा सुरू ठेवला आहे. अर्थात चांगल्या गोष्टीची जाहिरात व्हायला हवीच. पण सततच्या जाहिरातींनी एखादी गोष्ट चांगली वाटायला लागते हे ही लक्षात घेतले पाहिजे.

मिठाचा असा उत्प्रेरक म्हणून वापर करुन खरेच ढगातील वाफेचे पावसाच्या थेंबात रुपांतर होण्यचा वेग वाढवता येतो का? माझ्या माहिती प्रमाणे तर वाफेचे पाण्यात रुपांतर होण्याची क्रिया ही भौतिक क्रिया आहे. अशा भौतिक क्रियांमध्ये उत्प्रेरक वगैरे असते का याबद्दल मी जरा अज्ञानीच आहे.

वर सांगितल्या प्रमाणे हवेतील आर्द्रता आणि ढगांचे प्रमाण यांचा अपेक्षित मेळ जमला की हा प्रयोग करता येतो. आणि मग चोवीस तासात पाऊस पडतो. पण असा मेळ जमणे हे निव्वळ नैसर्गिकरित्याच फक्त होऊ शकते. आणि असे घडून आल्यावर आपसूकच पाऊस पडत नाही काय. किंवा पाऊस पडण्याच्या शक्यतेची टक्केवारी वाढत नाही काय.

कुठल्याही कामामागे कोणाचा हातभार व सहभाग आहे या वरुन कामाची किंमत कमी किंवा जास्त मानन्याची एक जून खोड काही जणांना असते. खरे तर ह्या कामाच्या उपयोगितेतली व यशातली वैश्विकता हा निकष कामाची प्रत ठरवण्यासाठी वापरला जावा. वरुण यंत्रावरची एक मजेशीर प्रतिक्रीया वाचनात आल्याने हे लिहीले आहे.

ती प्रतिक्रिया अशी -श्री. मराठेसाहेब नमस्कार, आपण एकप्रकारे होम करून पाऊस पाडण्याचा प्रयोग केला आहे. हेचकाम आपण वीज निर्मिती केंद्रात चिमणी मध्ये ढगाळ वातावरण असताना मीठ टाकून कमी खर्चात आणि जास्त प्रमाणात करू शकतो असे मला वाटते. हा प्रयोग सरकारी मदत घेऊन करावा लागेल. कितपत जमेल याबद्दल शंका आहे. आपण सर्व प्रयोगकर्ते चित्पावन ब्राम्हण आहात याचे मला कौतुक वाटते .

असो वरुणयंत्राचा मंत्रालयातही प्रयोग झाल्याचे वाचनात आले आहे. जर हे प्रकरण खरेच मानवजातीच्या इतक्या उपयोगाचे असेल तर यावर लगेच सरकारने पाडताळणीसाठी तज्ज्ञांची समिती नेमायला हवी.

शुक्रवार, ११ जून, २०१०

जनगणनेत जात?

भारत सरकारच्या वतीने देशव्यापी जनगणनेचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी असलेल्या भारतात होऊ घातलेली ही जनगणना अर्थातच अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्यक्ष जनगणनेला अद्याप सुरुवात व्हायची आहे. ही जनगणना जातीनिहाय व्हावी की नाही याविषयी सध्या मतमतांतरे आहेत. जात हा भारतीय समाजव्यवस्थेवरील कलंक असल्याचे काहींचे मत आहे. पण जात हे भारतीय समाजव्यवस्थेचे एक अभिन्न अंग असल्याचे जातीव्यवस्थेवरच्या टिकाकारांनाही मान्य करावे लागते. आज भारतात सर्वच जातींची रचना ही उतरंडीप्रमाणे आहे. जातीत सामाजिकदृष्ट्या उच्चनीचता असल्याने ज्या जाती नीच मानल्या गेल्या त्या सामाजिक तसेच शैक्षणिक, सांपत्तिक व तत्सम बाबींमध्ये मागासलेल्या राहिल्या. उच्च मानल्या गेलेल्या जातींना सहज संधी उपलब्ध असल्याने त्यांचा वरील बाबतीत विकास झाला. हे सगळे सरसकटपणे झाले असे म्हणता येत नाही पण बहूतांशी असे झाले. हाच निकष प्रमाण मानून मागास जातींचे मागासलेपणाच्या बाबतीत वेगवेगळे वर्ग प्रवर्ग तयार केले गेले. (यात जी जात सामाजिकदृष्ट्या सर्वात खालच्या स्तरावर होती तिचा समावेश अर्थातच जास्त प्रमाणात मागासलेली जात अशा प्रवर्गात समावेश केला गेला. उदा. विशेष मागासप्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती इ.) या सगळया मांडणीत ज्या जाती सांपत्तिक व शैक्षणिकदृष्ट्या खरे तर मागास नव्हत्या पण जातीच्या उतरंडीत त्यांचे स्थान खाली होते त्यांचीही रवानगी एकाच न्यायाने मागासवर्गात करण्यात आली. (उदा. सोनार, गुरव, वाणी, माळी यांना ओबीसीत तर राजपूत लोकांना भटक्या विमुक्त जातीत टाकण्यात आले.) ज्या जाती खरे तर सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या सरसकट सुधारलेल्या नव्हत्या त्यांचा समावेश सामाजिकदृष्ट्या उच्च जातीचे असल्याने खुल्या प्रवर्गात झाला. (उदा. कुणबी, मराठा, मुसलमान) या सगळ्यांसाठी १९३० सालची म्हणजे जवळपास ऐंशी वर्षापूर्वीची जातीनिहाय झालेली जनगणना आधारभूत मानन्यात आली. आज नव्याने या मागासवर्गातील लोकांची संख्या माहित व्हावी म्हणून जातिनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. या मागणीला विरोधही होत आहे. सध्याच्या माझ्या माहितीनुसार जातिनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ खालील मुद्दे मांडले जातात.
१. कोट्यावधी रुपयांचा निधी मागास जातींच्या विकासासाठी आज खर्च केला जातो. अनेक योजना सोयी, सवलतींची आखणी व अंमलबजावणी केली जाते. हे सगळे ऐंशी वर्षापूर्वीची जनगणना आधारभूत मानून केले जाणे योग्य नाही.
२. जातनिहाय जनगणनेमूळे त्या त्या जातीची खरीखुरी लोकसंख्या पूढे येईल आणि अल्पसंख्य, बहूसंख्य म्हणून जे राजकारण चालते ते बदलेल. ( खरे म्हणजे हे राजकारण चालूच राहील फक्त बदलेल कारण नव्याने हाती आलेल्या आकड्यात काही बहूसंख्य व काही अल्पसंख्य जाती असतीलच)
जातिनिहाय जनगणनेचा विरोध करतांना खालील मुद्दे मांडले जातात.
१. अशा जनगणनेमुळे जातीजातीतला दूरावा वाढेल. बहूसंख्य अल्पसंख्य असे वाद सुरु होतील.
२. जातीभेद निर्मुलनाच्या चळवळीचा आजपर्यंतचा प्रवास उलट्या दिशेने सुरु होईल.
वरील मुद्यांमध्ये अजून बरीच भर पडू शकते. पण या सगळ्यात जर जातीनिहाय जनगणनेचा निर्णय झालाच तर मागास असण्यानसण्याचा आणि विशिष्ट जातीचा असण्याचा कितपत संबंध सध्याच्या काळात आहे याविषयी संदेह वाटतो. जनगणनेतून हाती आलेल्या जातींना त्यांच्या जातींच्याच आधारावर (त्यांच्या मागास असण्यानसण्याचा विचार न करता ) जर सोयी सवलती दिल्या जाणार असतील तर ते कितपत योग्य ठरेल हा ही मोठा प्रश्न आहे.
एकूणच जनगणना जातिनिहाय असावी का? असावी तर का? नसावी तर का?
(जनगणना फॉर्म मधल्या सध्याच्या प्रश्नावलीवरुन तरी एखादे कुटुंब मागास की प्रगत हे निर्विवादपणे स्पष्ट होते असे दिसते. मग तरीही जात का असाही एक प्रश्न मनास पडतो.)

गुरुवार, २० मे, २०१०

शिक्षणाचा मूलभूत हक्क की कारस्थान ?

एखादी चांगली गोष्ट घडत असली की काहीतरी कुजक्या शंका काढून त्यात खोडा घालायची सवय काही महाभागांना असते. अर्थात ज्याचा त्याचा विचार करण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्याने मला तरी वाटते की अशा शंकासुरांचा मूळ बाब निर्दोष ठरण्याला बऱ्याचदा उपयोग होतो. कधीकधी सामोऱ्या न आलेल्या बाजू अचानक दृष्टीक्षेपात येतात.

केंद्रशासनाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार माननारे ऐतिहासिक वगैरे असे एक विधेयक सध्या मंजूर केले आहे. ज्यामूळे शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत अधिकारात समावेश झाला आहे. महाराष्ट्राने आपला पूरोगामीपणा दाखवत (की मिरवत) हे विधेयक तात्काळ राज्यात लागू केले आहे. यानुसार नुकत्याच राज्यशासनाने काढलेल्या अधिसुचनेनुसार आता इयत्ता आठवीपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला अनुउत्तीर्ण करता येणार नाही. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या वार्षिक परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नापास घोषित केले असेल त्यांना पूढच्या वर्गात प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असो.

तर शंका अशी की विद्यार्थ्याचा घरी करवून घ्यावयाचा अभ्यास ही जी काही शाळाबाह्य संकल्पना आहे ती फक्त संख्येने अतिशय मर्यादित असणाऱ्या मध्यमवर्गाबाबतीत अवलंबली जाणारी बाब आहे. महाराष्ट्रातच नव्हे देशभरात मुलाचा गृहपाठ घरी करुन घेणे तर सोडाच पण त्याने त्याच्या शाळेच्या वेळेत काळी केलेली पाने पाहण्यासही त्याच्या आईबापाला वेळ नसतो. हे घडून येते ते त्यांच्या गरीबीपायी किंवा अज्ञानापायी. नोकरदार व तत्सम मध्यमवर्गात मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायच्या वेळापत्रकाचे नियोजन आईवडीलांनी व्यवस्थितपणे पाळलेले दिसून येते. या सगळ्यातून एक बाब समोर येते की नापास करु न शकणाऱ्या भाबड्या शिक्षकाची इथून पूढे काडीचीही भीती न बाळगणारे मूल निदान आईवडीलांच्या गृहपाठाने तरी किमान ज्ञानाचे धडे गिरवत राहील. (शिक्षकाने विद्यार्थ्याला भीती दाखवलीच पाहीजे का? ही बाब इथे दूर्लक्षिली जरी गेली असली तरी पास होणे ही जबाबदारी मानूनच भाबडी मूले कष्ट करुन शिक्षकाला सहकार्य करीत असतात. आपणाला ज्ञान मिळवायचे आहे या भावनेतून शिकायचे असा विचार करण्याची त्यांची क्षमता असते का याची मला शंका आहे.)

या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिकणारे लाखो विद्यार्थी कोणत्या उद्दीष्टाला समोर ठेऊन ज्ञान संपादन करतील हा प्रश्नच आहे. शिक्षकांना (अपवाद क्षमस्व) आजपर्यंत ज्या पोरांच्या परीक्षा घेतल्या त्यांचे नियमानुसार पेपर तपासून त्यांना पास करता करता नाकीनऊ येत होते. ती पोरे आता विनासायास वरच्या वर्गात जात असतांना पाहून हायसे वाटेल. (विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या नव्या पद्धतींनी शिक्षकाची जबाबदारी निश्चित केली जाईल असे शासन म्हणते आहे हा एक दिलासा.) पोरगा पास झाला का याची तरी ग्रामीण भागात पूर्वी विचारणा होत होती आता त्याचीही सोय राहीली नाही. शिक्षणतज्ञांचे या विधेयकानंतर दर्जाबाबतचे मत पाहीले तर त्यांना मूल पहील्यांदा शाळेत आले व टिकले पाहीजे हे महत्त्वाचे वाटते. अनेक मुले आज शाळाबाह्य ठरली आहेत हे मान्य पण जी शाळेत येतात. नियमित अभ्यास करतात. एकेका मार्कासाठी शिक्षकांना भांडतात. अभिमानाने दरवर्षी गुणपत्रक मिरवतात त्यांना आता आपण अभ्यास कशासाठी करायचा ह्याचे काहीतरी संयुक्तीक कारण पटवून द्यावेच लागेल. अन्यथा सगळी मूले आठवी पास होतील आणि नववीत अर्धी व दहावीत अर्धी गळतील. ही सगळी गळती अर्थातच ग्रामीण भागातल्या मुलांची असेल. कारण आज फक्त ग्रामीण भागात औपचारीक शिक्षण हे शंभर टक्के शाळेवर अवलंबून आहे. पहीलीत घातलेल्या पोराची प्रगती कितपत झाली हे खेड्यापाड्यातल्या आईबापांना मुलगा दहावीत पास/नापास झाल्यावरच कळते. एरवी आजही फक्त परीक्षेला गैरहजर राहणारी मुलेच फक्त नाईलाजाने नापास केली जातात. आता तर गैरहजर राहीला तरी शिक्षक या विद्यार्थ्यांची मिनतवारी करुन त्याला पूढच्या वर्गात प्रवेश देणार आहेत. म्हणजे ग्रामीण भाग त्यातही ग्रामीण भागातल्या अशिक्षित, मोलमजुर, शेतकरी लोकांची पोरे फक्त आठवीपर्यंत शिकतिल आणि मग पुढचे सगळे मार्ग शहरी मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय मुलांच्या पाल्यासाठी मोकळे उरतील. आठवी पर्यंत सक्तीचे शिक्षण म्हणजे फक्त आठवीपर्यंतच शिक्षण असे होण्याचीच शक्यता जास्त वाटते. शिक्षणाचा अधिकार मूलभूत नसतांनाही लाखो मूले शिकत होतीच. शिक्षणाचा हक्क देण्याची भाषा करतांना आपण समाजाच्या मोठ्या भागाला फक्त प्राथमिक शिक्षणापूरते मर्यादीत करण्याच्या मोठ्या कटकारस्थानात तर सहभागी होत नाही नाही ना याचा ही या निमित्ताने विचार व्हायला हवा.




रविवार, ९ मे, २०१०

नवस

उडणाऱ्या धूळीची
वाट गावाकडची,
सांजावलेला दिवस
ओढघराकडची.

अंगाला अंग घासत
आमचा चाललेला कळप,
उगाच बें बें करीत
कधी थांबत कधी पळत.

घरापाशी आल्याबरोबर
वेगळा झालो कळपापासून,
हात बदलले हाकणारे
जीव दाटला कसमसून.

टरकामधला प्रवास
खायला कोवळा चारा,
वाटलं आज सुखाला
नशिबानं दिलाय थारा.

गळ्यात घातलेला हार
अन कुंकवाने पूजन,
देवापूढं मान दाबून
मला घडवल्या गेलं दर्शन.

जीव एकवटून माझा
मी पाय घट्ट रोवले,
जेव्हा शेंदऱ्या दगडाजवळ
लालभडक रक्त पाहिले.

पाय खोरले जात होते
इतकेच आहे आठवात,
खच्चून साद दिली होती
जीवघेण्या आवाजात.

माझाच बळी देऊन देवा
इतका नवस कर पुरा,
एकदा पोटचं लेकरू धरून
नुसता लावून बघ सुरा.

थरारलास ना आतून
मग कशी असेल माझी माय,
कसे तुझे दानव भक्त
कसा तुझा उलटा न्याय.
000

शुक्रवार, ७ मे, २०१०

आधूनिक लोकगीते?

महाराष्ट्रातील लोककलाप्रकारांत लोकगीते हा एक महत्त्वाचा भाग आहे. कुणीतरी अनामिक निर्माता असलेल्या या गीताचे सादरीकरण होता होता ते गीत जेव्हा साऱ्या समुहाचेच बनुन जाते तेव्हा त्याला लोकगीताचा दर्जा प्राप्त होतो. प्रसंगी लोकगीत ही समुहाची निर्मिती सुध्दा असते. आज महाराष्ट्रात लोकगीते म्हणून ज्या कॅसेट्स व सीडी प्रकाशित होत आहेत त्या गीतांकडे ही लोकगीतांची आधूनिक आवृत्ती म्हणून पहाता येते. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक लोकगीते एचएमव्हीच्या व आकाशवाणीच्या सहाय्याने घराघरात जाऊन पोहोचली व अजरामर झाली. त्यांची परंपरा नंतर पुढे आनंद व मिलिंद शिंदे यांनी काही प्रमाणात चालवली. काही प्रमाणात या साठी की आनंदमिलिंद यांनी नंतर लोकप्रियता व द्विअर्थी रचनांना जास्त महत्त्व दिले. खरे तर असे म्हणणे ही मलाच पून्हा एकांगी वाटते. आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या व त्यांच्या सोबत इतर समकालीन लोकगीत गाणाऱ्या गायकांची एकूण गीते पाहता त्यातल्या द्विअर्थी गाण्यांची संख्या मर्यादीतच आहे. परंतु या अशा द्विअर्थी गाण्यांना प्रसिद्धी मिळण्याचे प्रमाण मात्र अर्थातच जास्त आहे. अभिरुचीचे काही संकेत निर्माण करणारी व सर्वांवर ते संकेत लादू पाहणारी एकूणच व्यवस्था या व इतर गीतांकडे डोळेझाक जरी करत आली असली तरी जनमानसांवर या गीतांनी केलेली जादू मात्र नाकारता येणे शक्य नाही. जवा नवीन पोपट हा या गीताने आनंद शिंद्यांना प्रसिद्ध केले. हे गीत द्वीअर्थी नव्हते. त्यानंतर दरसाल एक तरी हीट गाणे देऊन त्यांनी आपला चाहता वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण केला. ज्या गीतांशिवाय अभिजनांच्याही लग्नाच्या वरातीला पूर्णत्व येऊ शकले नाही अशी गीते दरसाल प्रसिद्ध होणारी गीते आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेली आहेत. उदा.


हॅलो मी बाबूराव बोलतोय.
माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं.
हाताला धऱलया म्हणती लगीन ठरलंया

अशी अजूनही कित्येक गाणी लोकांच्या लक्षात असतील. आणि या गाण्यांना द्विअर्थी म्हणता येत नाही. अर्थात द्विअर्थी गाण्यांच्या बाबतीत आनंदमिलिंद शिंदे यांनी काही वेळा अगदी कहर केला आहे हे मात्र मान्य करावेच लागेल. प्रल्हाद शिंदे यांनी मात्र द्विअर्थी गाणी गायली नाहीत. त्यांच्या

कुठ जातील काळ्या पोरी
दिसते कोणाची गाडी
गोडीनं नांदाव लागंलं सखे
संसार माझा छान
कशाचं खरं खोटं पिकतय रं
सुय़ा घे गं दाभण घे
जीव लावा पोरीला माझ्या जावईबूवा

या आणि अशा कित्येक भावपूर्ण व सुरेल लोकगीतांच्या तुलनेत चल ग सखे पंढऱीला ही कॅसेट तुफान गाजली. कदाचित समाजमनावर असलेला भक्तीरसाचा पगडा व एचएमव्हीचे व्यवस्थित मार्केटींग या गोष्टी सुद्धा त्याला कारणीभूत असाव्यात. असो एकूण या टिपणात लोकगीतांच्या नावाखाली द्विअर्थी गाण्याची जी अभिरुचीहीन रेलचेल सध्या सुरु आहे तिचे समर्थन करण्याचा अजिबात उद्देश नाही. पण द्विअर्थी नसलेली आणि चाल आणि विशिष्ट ठेक्यावर ताल धऱायला लावणाऱ्या गाण्याच्या आस्वादापासून अभिरुची संभाळण्याच्या नादात कुणी दूर राहू नये असे वाटते. या निमित्ताने वाचकांनी आपल्या आठवणीतील काही या प्रकारची गाजलेली लोकगीते सांगावीत. या गाण्यांचे प्रकाशन जरी लोकगीते म्हणून होत असले तरी ती खरेच लोकगीते आहेत का यावरही अभ्यासूंनी अवश्य मत व्यक्त करावे. बाकी या गीतांच्या प्रसिद्धी मागच्या कारणांचीही चर्चा करता येईल.

शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

तुझ्या हाकेसरशी

तुझ्या हाकेसरशी
पापण्या थरारल्या,
धडधडले काळीज
चित्तवृत्ती फुलारल्या.

तुझ्या हाकेसरशी
बांगड्यांची किणकिण,
अंगावरती गोड शहारे
पैंजणांची रुणझुण.

तुझ्या हाकेसरशी
कासावीस झाला प्राण,
विखुरल्या बटा
नुरले पदराचे भान.

तुझ्या हाकेसरशी
झाला जादूटोणा कसला?
अन माझ्या खानदानी
कुळाचा पाया खचला.

तुझ्या हाकेसरशी
भररात्री आले,
आयुष्य सारे उरलेले
पहाटेच्या शोधात गेले.
000

शनिवार, २४ एप्रिल, २०१०

दरबारात तुझ्या...

दरबारात तुझ्या
भक्तीची मात झाली,
पोटासाठी दिवा झाला
चैनीसाठी वात झाली.

तुझ्या अभिषेकाचे पाणी
कोणत्या शेतात गेले,
पाण्यातूनही कमाई
अन पिकांचेही नफे झाले.

देवा तुझी भूक
कुणी जिवंत केली,
शांतीची यात्रा मनापासून
तिजोरीपर्यंत नेली.

तुझ्या बडेजावाने रे
नित्य डोळ्यांचे दिपणे,
विसरू लागले तुझे आता
भक्ताघरी खपणे.

तुझ्या वरास्तव आता
पुण्याई का साठवू?
ही जमलेली रक्कम सांग
कोणामार्फत पाठवू?
000

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

वाईट करणाऱ्यांचे खरेच वाईट होते काय?


महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे. मंदीरातील अभिषेक बंद करण्यावरुन वाद घालणाऱ्या पुजारी आणि इतर संबंधित मंडळींचे हात दानपेटीतल्या भ्रष्टाचारात देखील प्रत्यक्षअप्रत्यक्षरीत्या गुंतलेले आहेत हे या निमित्ताने स्पष्ट झाले. मंदीरातील मुर्तीला अर्पण केल्या जाणाऱ्या साडीचोळीचा लिलाव होऊन ह्याच साड्या पुन्हा अव्वाच्या सव्वा किमतीला भक्तांच्या माथी मारल्या जातात हे सर्वांना माहित असेलच. पण तुळजाभवानीच्या दानपेटीतील दागिन्यांचा इतक्या पद्धतशीर पणे अपहार करुन गब्बर बननाऱ्यांचे हे कृत्य त्यांच्या अपूर्व धाडसाची प्रचीती देऊन जाते. ( इथे कुणाचे चारआणे किंवा एखादी पेन्सिल चोरली तर देव शिक्षा देईल याचा आम्हाला भयंकर धाक असतो.) तुळजाभवानीच्या गुप्तदानपेटीत भाविक जो पैसा व दागिने टाकतात त्याचा दरमहा लिलाव करण्याची पद्धत आहे. या लिलावात फक्त ठराविक लोकांनाच भाग घेता येईल याची व्यवस्था केली गेलेली आहे. या लिलावाच्या मूळ बोली रक्कमेत व लिलावात भाग घेण्याच्या शुल्कात गेल्या दहा पंधरा वर्षात अवघ्या काही हजारांची वाढ झालेली आहे. आणि या शुल्काचा फक्त काही हिस्सा घेऊन अनेकांना लिलावात भाग घेऊ देण्याचे औदार्य अनेकवेळा दाखवण्यात आलेले आहे. आणि जे काही शुल्क घेतले त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. गेल्या दहा ते बारा वर्षापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष व धर्मादाय आयुक्तांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्याच्या नियमालाही तिलांजली दिली गेली. हे सगळे आपल्या उपस्थितीत व्हायला हवे याची तत्कालीन जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त यांना माहित नसण्याचीच शक्यता आहे किंवा हेतूपूरस्सर त्यांना त्याकडे दुर्लक्ष केले असणेही शक्य आहे. या सगळ्या लबाड साखळीत अनियमितपणा निर्माण झाल्यामुळे म्हणा की काही अन्य कारणामूळे म्हणा या सर्व प्रकाराबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. धर्मादाय आयुक्तांनी दानपेटीत जमा होणाऱ्या देणगीची सरासरी काढण्याच्या उद्देशाने एक महिन्याच्या अंतराने दानपेटी उघडली तेव्हा त्यात तब्बल बावीस लाख रुपये रोख, त्रेचाळीस तोळे सोन्याचे दागिने व साडेपाचकिलो चांदीच्या वस्तू आढळून आल्या. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षातील लिलावाची माहिती प्रशासनाला देतांना संबंधितांकडे दहा वर्षात सेहेचाळीस ग्राम सोने व अर्धा कीलो चांदी इतकेच दान जमा झाल्याची माहिती दिली होती. एकंदरीत लोकांच्या श्रद्धाभावनेचा (!) गैरफायदा घेऊन लिलावात सहभागी लोकांनी वर्षानुवर्ष स्वतःचे उखळ पांढरे करुन घेतले. लोकांच्या श्रद्धेशी खेळू नका असे म्हणत मूर्तीची झीज होत असल्याचा अहवाल असतांनाही अभिषेकांवरच्या बंदीला विरोध केला. या सर्वात त्यांना भवानीच्या कोपाची भीती कशी वाटली नाही याचा विचार भोळीभाबडी जनता आता करत असेल. पण या लोकांना नक्की माहित असते की आपल्या समोर जो मांडला आहे तो फक्त दगड आणि तो आपले काही वाकडे करु शकत नाही. म्हणून मुजोरपणाने देवादेखत लोकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे काम ही मंडळी बिनबोभाटपणे करु शकतात. जनतेचे प्रातिनिधीक स्वरुपातले प्रतिनिधीसुध्दा केले त्याला भरावे लागेल अशी निरर्थक आशावादी विधाने करुन या प्रकारांकडे दुर्लक्ष करतात. पण जर केले त्याला भरावे लागले असते तर हजारो लोकांचे मुडदे पाडण्यात सहभागी असणाऱ्या दाऊद इब्राहीमला अख्खे आयुष्य सुखासमाधानात जगायला मिळाले नसते. कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोठे पुरस्कार मिळून कृतकृत्य होता आले नसते. जो लबाडी करतो त्याच्या विरोधात कायदा माननाऱ्यांनाच उठाव करावा लागणार आहे. करेल तो भरेल या नावाने सुजाण लोक शांत बसून राहीले तर या अपप्रवृत्तींचे दिवसेंदिवस फावणार आहे. कारण यांना पक्के कळून चुकलेले असते की असे काहीच भरावे लागत नाही.

सोमवार, १२ एप्रिल, २०१०

आपल्या घरी

कशाच्या शोधापायी
आज घर धूसर झाले?
हक्काची उब अन
मायेचे हात धूसर झाले,
जिंदगी उजळण्यासाठी
 दिवे शोधत राहिलो
उजेडाने दिपली नजर
 अन घर धूसर झाले.

किती सुखात असतो जर आपल्या घरी असतो,
आपल्याच ढंगात असतो जर आपल्या घरी असतो.

निस्तब्ध हवा या इथे हा घसा कोरडा पडलेला,
गार पाणी प्यालो असतो जर आपल्या घरी असतो.

चंद्राचे तारकांमधून चालले शेखी मिरवणे,
चांदण्यात न्हालो असतो जर आपल्या घरी असतो.

झाकोळ अचानक आभाळी हे विजेचे कडाडणे,
असे कधी थरथरलो नसतो जर आपल्या घरी असतो.

वादळलेल्या या वळणावर वास खमंग पोट पोरके,
पोट भरून जेवलो असतो जर आपल्या घरी असतो.
000






मंगळवार, २३ मार्च, २०१०

चांदरात

काजळकाळा कृष्ण जणू
व्यापून गेला रान,
काळ्याकुट्ट आसमंती
अवघडून उभे एक पान.

मिट्ट झुळूक वाऱ्याचीही
सरसरत निघून गेली,
अंधारा बिलगून बसल्या
गडद मिठीच्या वेली.

अशा या गर्द प्रवाही
चंद्रकिरण सळसळले,
त्या तिथे असावे क्षितिज
पहुडल्या ओढ्याला कळले.

सोडते गंधीत हुंकार
रानफुलांची जाळी,
दूर आतुरला घुबड
देतो कुणा आरोळी.

हाळीने अपशकुनाच्या
अंधार गहिरा बावरला,
डोहात पहुडला चंद्रही
हलकेच जरा थरथरला.
चंद्राने प्रसवल्या प्रतिमा
जणू तिच्या पायीचे चाळ,
चंद्राचे खेळती वंशज
करुनी रुपेरी ओळ.

ही माळ चांदपुतुळ्यांची
रात्र घालुनी सजते,
कल्पून स्वतःचे रूप
गडद स्वतःशी हसते.
000

शुक्रवार, १२ मार्च, २०१०

आहोत ना आपण दोघं...

आता थांब थोडीशी
पुरे झाली दगदग,
आयुष्यभर राबूनही तुला
कसा नाही येत उबग?

आठवते विशीतली
तुझ्या कपाळीची चंद्रकोर,
काया तुझी नव्हाळीची
मनातले नाचरे मोर.

सकाळीच विझवून दिवे
तू कामामागे लागायचीस,
राबून सारा दिवसभर
सारं सोसून वागायचीस.

नाही हरखवू शकलो तुला
आणून एखादी भेट,
तरी भिडून राहिलीस तू
या ह्रदयाशी थेट.

कधी गमावून आधार
माझा झोक जायचा,
हलत्या काळजाचा झोका
तुझ्या डोळ्यात दिसायचा.

चार तपं झाली असतील
पण वाटतं क्षण चार,
आताशीच तर झाला होता सुरू
तुझा माझा संसार.

पोरं सुना उडून गेली
सारा चिवचिवाट घेऊन,
पण नको म्हणूस कधी
'काय करायचं जगून! '

आहोत ना आपण दोघं
जगू नवी कहाणी,
गुणगुणू एखादं गाणं
कधी पुसू डोळ्यातलं पाणी.

आता कर पोळ्या छान
मी भाजी खुडू की तांदूळ नीसू,
घटकाभराने देऊ ढेकर
मग गप्पा मारत बसू.













000

मंगळवार, ९ मार्च, २०१०

आभाळ

आपण तुटतच गेलो सारखे
तुटल्यापासून नाळ
तरी तुझ्यावर पांघरलेलं
आहे माझं आभाळ.

रांगता-चालतानाच
दुडुदुडू धावलीस
कधी पापे घेतलेस
कधी कडकडून चावलीस

हळूहळू तोडत गेलीस
भावगर्भांचे पाश
कळलंही नाही कधी पांघरलंस
जाणीवांचं आकाश.

विसरून निष्ठुर कायदे
मी झाले आश्चर्यचकित
जेव्हा निघून गेलीस तू
हळूच त्याच्या मिठीत.

म्हणायचीच 'उपटून दुसरीकडे
लावता येईल का झाड?
रुजतील का मुळे त्याची
होईल का गं वाढ! '

कळलं ना 'जागा असते दुय्यम'
फक्त माया जिवंत हवी
मग रमतोच जीव कुठेही
उमलते पालवी नवी.

परक्या बागेत उमललीच आसवे
तर तुझी तूच ढाळ
पण नको विसरू कधीही
पांघरलेलं आभाळ.












000

शनिवार, ६ मार्च, २०१०

गहन प्रश्न अर्थात किरकिर

आपण कुणी समाजसुधारक नाही आणि आपली कीरकीर ऐकायला कुणाला वेळही नाही याची पूरेपूर जाणीव असतांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमूळे आपली स्वतःचीच कीव करावीशी वाटून जाते. की आपला स्वभावच नकारात्मक झाला आहे.  पण चला.  आपण ही आपली घालमेल लिहून टाकू येथे. जगाचं जे व्हायचं ते होईल निदान आपलं मन तरी थोडंफार हलकं होईल.
 कालपरवा स्वामी नित्यानंद महाराजांच्या लिलांचे बऱ्यापैकी मार्केटींग करण्यात इलेक्ट्रॉनिक मिडीयाने यश मिळवले. या महाराजांच्या निषेधापायी पून्हा सामान्य जनताच वेठीस धरली गेली. या जनतेतलीच बरीच डोकी आधी त्यांच्यावरच्या भक्तीपायी वेठीस धरल्या गेली होती. स्वामी नित्यानंद यांचा किंवा अशा मंडळींचा आधी श्रद्धेने ओतप्रोत अशा शब्दप्रयोगांनी उल्लेख करणाऱ्या लोकांनी नंतर जाहीरपणे त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार केला. यात कोण मुर्ख बनते आहे. आणि कोण बनवते आहे. आपण आपल्यावरच हसतो, चिडतो आहोत की आणखी कुणावर हा प्रश्न नेहमीप्रमाणे बाजूलाच राहीला. नित्यानंदासाठी नरेंद्र मोदींनीही हेलिकॉप्टरने हजेरी लावली होती हे नंतर चर्चिल्या गेले. जनतेच्या प्रतिनिधींनी सार्वजनिकरित्या आपल्या तथाकथित श्रद्धेचे प्रदर्शन करणे खरे तर लाजिरवाणे आहे. पण हे सगळे एखाद्या महाराजांचा भंडाफोड झाल्यावरच. तोपर्यंत ती लोकभावनेची एका सुज्ञ व्यक्तीने केलेली कदर असते. बरं हा भंडाफोड ही जनमाणसावर फार काळ परिणाम करु शकत नाही. ज्या सत्यसाईबाबांची पद्मपाद्यपूजा की काय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी केली त्या सत्यसाईबाबांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांवर काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या मासिकांचे स्पेशल एडीशन निघाल्याचे मला आठवते. कालपरवा ज्या कृपाळू महाराजांच्या कृपेने सत्तरावर लोकांना जी सद्गती मिळाली त्या कृपाळूमहाराजांना बलात्काराच्या आरोपांनंतर नागपूरहून हाकलण्यात आले होते हे ही बऱ्याच जणांना आठवत असेल. बरं कृपाळू महाराजांची भक्तमंडळी तर महाराजांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यावर या मृत लोकांना काळाने मारले त्यात महाराजांचा दोष काहीच नाही असे सांगत आहेत. नित्यानंदांच्या युट्यूब मिटक्या मारत पहाणारेही अर्धीमुर्धी क्लीप पाहील्यावर थोडे मनाशी चडफडून महाराजांना शिव्या घालीत आहेत. या शिव्या संस्कृतीच्या अधःपतनाबद्दल कीती आणि संधी का न मम जिवाला या न्यायाने घातल्या जात आहेत हे ही या मंडळींना एकदा विचारायला हवे. आणि मूळात एखाद्याच्या खाजगी आयुष्याची अशी लक्तरे टांगणारेही संस्कृतीनिष्ट किती आणि व्यवसायनिष्ठ किती हा प्रश्न उरतोच. शेवटी माणूस काय नि महाराज काय हा सामान्य विकारांना बांधील असतोच. बाकी तपस्वीपणाच्या आणि आत्मज्ञानाच्या गप्पा माराव्या त्या नित्यानंदक्षमता निकामी झाल्यावरच. अन्यथा सर्व वृथा खेळ. माणसाने माणूसपणाच्या संस्कृतीचा मुलामा कितीही मिरवला तरी तो मुलामाच. माणूस हा शेवटी एक पशूच. तो दिवसरात्रीतल्या काही क्षणापूरता का होईना पशूसारखा जगू इच्छितो. जगो बापडा. पण असं जगतांना त्याने सामान्य माणसाच्या श्रद्धेला का वेठीस धरावे. आणि जी वेठीस धरली जाऊ शकते ती श्रद्धा असते का. मांढरदेवीला जा की हज यात्रेला, कृपाळू महाराजांकडे जा की अजून एखाद्या दैवताकडे. जेव्हा जीवावर बेतते तेव्हा आपणच आपल्याला धावपळ करुन लोकांना, लोकांच्या लहानग्यांना पायाखाली तुडवून वाचवायला हवे. ही दगडी दैवते आपल्या कामाची नाहीत हे जनतेला कळते. शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत, प्रसंगी उन्हातान्हात वृद्धांना लेकरांना पायी चालवत या दगडांपर्यंत पोचतांनाच माणसाची ही समज कुठे जाते हा मोठा गहन प्रश्न आहे......

बुधवार, ३ मार्च, २०१०

उत्तर

लौकिक सारे ध्येय मनाचे
सामावलेले या हातात,
तरीही अजून भूक जागी
या देहाच्या कणाकणात.

पंखांना अजूनही वाटे
घ्यावे पुढचे आकाश कवेत,
स्नायू असे हे वाकत राहो
अन् झेपावत या हवेत.

पण काही ओंजळींचीच होती
कालच तर ही तहान माझी,
खांद्यांना या नव्हती पेलवत
आशा अपेक्षांची ओझी.

पण आता उंच भरारीस्तव
धावपळीचा कणकण क्षणक्षण,
विचार जर करतो थांबून
'का उरात असले हपापलेपण? '

या अतृप्ती अन् व्यस्ततेचे
मग मला उमगते उत्तर
'पुसायचे आहे तू दाखवलेले
ते तुझ्या नि माझ्यातले अंतर. '
०००

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

तू नसतांना

तू नसताना
मनात हुरहुर
आठवणींचा पूर अनावर,
एकटेपणा दूरदूर
गहीवराचे ओझे मनावर.

तू नसताना
जीवाची तगमग
सभोवताली तुझ्याच प्रतिमा,
विरोधात हे सारे जग
अन् दुःखाला नसते सीमा.

तू नसताना
कडवटलेले सारे घास
जाहलेला जीव निशाचर,
झाडापानात तुझेच भास
स्पर्शभ्रम ते अन् अंगावर.

तू नसताना
सोबत असते तुझी आस
काट मारलेल्या तारखा,
तुझ्या येण्याचा घेऊन ध्यास
उत्सुक होतो मी सारखा.

तू नसताना
स्वप्न उराशी वेडेभोळे
येऊन गुपचूप पाठीमागून,
झाकशील तू माझे डोळे
हसशील कानाशी लागून.
***

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

गृहीत

ओझे सावरत
काळजीपूर्वक चालत
आर्तपणाने हसत.
नेहमीच पाणावल्या
वाटणाऱ्या डोळ्यांनी,
तू उतरतेस माझ्या आत
आता वेगळ्याच वाटांनी.

मी आतून पोखरलेला
भांबावून गेलेला
दाटून आलेला.
घट्ट करतो
माझं आक्रंदणारं मन,
दबता दबत नाहीत
तुझ्यासोबत जगलेले क्षण.

बरे होतो दोघेच
दोघांच्या दुनियेत
आनंदात.
मायबाप होण्याच्या ओढीने
या वाटांवर,
विलगणार तर नाहीत ना नावा
या अवघडल्या लाटांवर.
...

स्वच्छ नितळ मन
थोडेसे तरंगलेपण
गाठतो माहेर तुझे हवेवर स्वार होऊन.
अन धरून घेतो गृहीत
'तू कशी आहेस, '
किरकिरणाऱ्या आवाजाची
'ती कशी आहे? '
***

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

अगतिक

डांबरी सडकेला सोडून बाजूला कच्च्या रस्त्याने थोडं आत गुपचूप गाव माझं,
सावत्र वस्ती, पडके देऊळ, मोडकी वेस, आतून पोखरलेल्या माड्यांचं ओझं.

रांगणारे पाय घेऊन परागंदा झालेला दाही दिशांना झेपावलेला हा जीव,
का डोळ्यांनी, कानांनी आणि रंध्रारंध्राने आतूर होतो जवळ आल्यावर शीव.

ओल्या डोळ्यांसोबत गहिवरलेले चेहरे थरथरते हात चेहऱ्यावर फिरणारे,
काळवंडलेले घरटे माझे करकरणाऱ्या दारांसोबत पाखरांसाठी झुरणारे.

थकलेल्या पायांचे ठणकणाऱ्या गुडघ्यांचे गाऱ्हाणे आभाळाला सांगणारे वाडे,
इतक्या काळाचे लिंपण तरीही दुभंग मिरवणारे आडवेतिडवे तडे.

मला निर्वासित बनवणारा भिरभिरवणारा इथल्या मातीचाच होता गुन्हा,
तरीही पंख वितळल्यावर उंची ओसरल्यावर मी होईन इथलाच पुन्हा.

सगळ्या तडफडीला थंड करून इथे खेचणाऱ्या रक्तापूढे मी अगतिक,
पाय पुढे टाकत टाकत मागची वाट चालणारा नि केविलवाणा पथिक.

***

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

ओढणी

गव्हाळ मानेवरी
लव सोनेरी,
तुझी नित्य असे
पखरण तीवरी.

गोऱ्या गालावरती
नित्य खळीचे पडणे,
तिच्याशी तुझे
लाघवी भिडणे.

नाजूक बोटांची
स्पर्श पारायणे,
त्यासाठीच तुझे
पुनःपुन्हा घसरणे.

वक्षकमानींवरले
तू एकरंगी इंद्रधनू,
विरळल्या ढगांआड
दूहेरी चंद्रतनू.

कमरेला कधी तुझी
करकच्चून मिठी,
झुरणारे जीव कितिक
तुझा जन्म घेण्यासाठी.
000

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

बंद आता....

बंद आता नाचणे
बंद आता हासणे.

बंद आता दरवळ
बंद आता बोचणे.

धागेदोरे शुन्य
बंद आता काचणे.

मंदावले अश्रू
बंद आता साचणे.

तूही काटा मीही काटा
बंद आता टोचणे.
000

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

ओल्या मेंदीवरले घाव..

स्वप्नाळल्या डोळ्यांवर
लालभडक लकाकी
नि खडबडून उठले
सकाळी सकाळी.

डोळ्यावरले उन
भींती सभोवतालच्या
उलगडल्या हळूहळू
खुणा अस्तित्वाच्या.

आठवल्या रात्रीच्या
खिदळणाऱ्या मैत्रीणी
मग मेंदी धूण्यासाठी
शोधत गेले पाणी.

गोऱ्यापान तळव्यावर
रेखाटलेली कलाकुसर
मात्र विस्कटून गेलेली
मेंदी एका कोपऱ्यावर.

ओल्या मेंदीवरले घाव
रंगीतपणात राहिलेले
स्वप्न जरासे भंगलेले
काल रात्री पाहीलेले.

उफाळून आठवली तुझी मिठी
पाणावल्या डोळ्यांनिशी
जिंदगी खुप रंगली रे
पण खंत राहीली उराशी...
000

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

कासावीस

उदास उन्हाचं रुप घेऊन
पांघरलेली सर्वत्र उदासी
दबकत वावरणारा वारा
झाडाझाडांच्या पायथ्याशी.

अंतहीन लांबलचक रस्ते
ओकाबोका आसमंत
पाचोळ्याची हालचाल अन्
झुडुपांचेही झुलणे संथ.

आठवणींची मनात गर्दी
दाटलेले हे अंतःकरण
कुठल्या कसल्या दुःखाला हे
चढलेले अवचित स्फुरण.

जडावलेले पाय आता
लागेल जणू केव्हाही ठेच
ह्रदयाला विदीर्ण करते
पोकळपणाची ही बोच.

रस्त्यावरल्या वाटसरुच्या
मनात असले विचार भयाण
पोचतील ना घरापर्यंत
कासावीस हे माझे प्राण?

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

साहित्य आणि समाजातील संबंध; कितपत खरे?

साहित्य ही जेव्हा कला मानली जाते तेव्हा तिच्या उपयोगितेचा मुद्दा बाद ठरवला जातो. परंतु साहित्यामधील समाजवादी, जीवनवादी आणि तत्सम विचारधारा माननारे साहित्याला जीवनापासून अलग मानन्याला नकार देतात. साहित्य आणि समाज या विषयात समाजाच्या अंगाने साहित्याचा आणि साहित्याच्या अंगाने समाजाचा अशा दोन पद्धतींनी विचार केला जातो. यामध्ये साहित्य हे समाजव्यवहारांना प्रभावित करते हा समाजवादी साहित्यिकांचा आवडता सिद्धांत आहे.

रविवार, १० जानेवारी, २०१०

या जातींचं करायचं काय?

जग दिवसंदिवस सुशिक्षित होत चालले आहे. या सुशिक्षितपणाबरोबरच माणसांच्या डोक्याचे होत असलेले यांत्रिकीकरण हा ही एक कळीचा मुद्दा आहे. माणसात येत असलेल्या या यंत्रवतपणामुळे संवेदनशीलता ही नावालाच शिल्लक उरली आहे. उरलेली ही संवेदनशीलता ही मनात निबरपणाच्या कित्येक थरांखाली दडून बसलेली आहे. जून्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. पण सर्वथा टाकून द्यावी असावी जात ही काही कुणाला सोडाविशी वाटत नाही. या जातीला प्रत्येक मनातून व समाजातून हद्दपार करण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. पण जी जात नाही ती जात अशी जातीची व्याख्याच काहींनी करून टाकली आहे.

साय

किती जपावे तरी
एखादा शब्द निघून जातो
फुलवावे फुलताटवे तरी
एखादा काटा बोचून जातो.

मराठी बालभारती इयत्ता सातवीच्या कविता

गदी माडगुळकरांची बिनभींतीची शाळा, नारायण सुर्वे यांची डोंगरी शेत आणि शशिकांत शिंदे यांची माणुसपण गारठलंय या कवितांच्या व्हीडीओ फाईल्स

इयत्ता सातवीच्या मराठी कविता

शांता शेळके यांची पावसात खंडाळा आणि बहीणाबाई चौधरी यांची धरित्रीच्या कुशीमधी या दोन कविता सोप्या आणि गुणगुणता येणाऱ्या चालीत........

शनिवार, ९ जानेवारी, २०१०

मराठी कविता वर्ग सातवा

इयत्ता सातवीच्या मराठी कविता बघा आणि अगदी सोप्प्या चालीवर म्हणा देखील.
ह्या पोस्ट मध्ये कुसुमाग्रजांची मराठीमाती आणि विंदा करंदीकर यांची समतेचे हे तुफान उठले
या दोन कविता ...