घाव अजुनी...

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

मातृभाषेच्या ठेकेदारांच्या सनातनीपणाचे व अहंगंडाचे काय करायचे?

शिक्षण हे मातृभाषेतून हवे हे निर्विवादरित्या मान्य आहे. प्राथमिक पातळीवर तर ते मातृभाषेतूनच हवे.

मराठी बोलणाऱ्या कुटुंबात वाढणाऱ्या अपत्याचे जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरु होते तेव्हा त्याचा भावनिक कोंडमारा होतो. त्याचा इंग्रजी संकल्पना समजून घेण्याचा प्रवास मराठी संकेत- इंग्रजी अर्थ -इंग्रजी संकेत या व अशा आडवळणांच्या मार्गाने चालतो.

उदा. त्याला स्काय शब्द शिकायचा तर स्काय शब्द ऐकल्याबरोबर पहिल्यांदा तो त्याचा मराठीतला अर्थ शोधतो जेव्हा आकाश हा शब्द सामोरा येतो तेव्हा कुठे मग स्काय ही संकल्पना स्पष्ट होते.

पण मराठी भाषाव्यवहाराची अघोषित मालकी ज्यांच्या कडे आहे त्यांना जगात जे काय श्रेष्ठ आहे ते आपल्याच कर्तृत्वाने कसे आहे हे लांड्यालबाड्या करुन का होईना जागोजाग पटवून द्यायची सवय जडलेली आहे. त्यामूळे जेव्हा विज्ञान मराठी भाषेतून शिकायचा प्रश्न येतो तेव्हा मराठी रुपांतर करतांना अवाजवी सनातनीपणा केल्याने व्यवहारात बोलल्या ऐकल्या जाणाऱ्या मराठी विज्ञानापेक्षा हे मराठीतले विज्ञान म्हणजे बोजडपणाचा उत्तम नमुना ठरते. यातली भाषा मराठी असते पण ती मातृभाषा मराठी नक्कीच नसते.

उदा. सनातनी पणाने इंग्रजी भाषेतील शब्दांचा मराठीत केलेला अनुवाद पहा

कॉम्प्यूटर - संगणक, डिस्क- चकती, टायपिंग-टंकलेखन, किबोर्ड-कळफलक, ऑपरेशन-शल्यचिकित्सा, आयसीयू- अतिवदक्षता कक्ष, सुपरवायझर- पर्यवेक्षक

या सर्व शब्दांपैकी जे मूळ इंग्रजी शब्द आहेत तेच वापरुन मराठी बोलली जाते. ती मराठीच असते इंग्रजी नव्हे.

मराठी भाषांतर करुन कायदा, विद्यूत अभियांत्रिकी (?) या विषयांवरची लिहीलेली पुस्तके वाचली की हा बोजडपणा अधिक प्रकर्षाने जाणवतो.

ज्या बाबी मूळात पाश्चात्य किंवा इंग्रजी जगतातल्या आहेत त्या फक्त लिपि व उच्चारात किरकोळ फेरफार करुन वापरल्या तर मराठी भाषेत विज्ञान व इतर तत्सम शाखांमधले ज्ञान घेणे अधिक सुलभ होईल.

विज्ञान शाखेत भरपूर नवीन लेख/पुस्तके/मासिके प्रसिद्ध होत असतात. ही बहुतेक करून इंग्रजीत असतात.

हे म्हणणे मान्य पण मराठीतून किंवा जगातल्या कुठल्याही भाषेतून जेव्हा विज्ञान शिकले जाते तेव्हा त्यातला मूळ शब्द संग्रह जो की बहूतेक करुन (वैज्ञानिक प्रगतीचे आद्यस्थान असल्याने) युरोपीय भाषांमधून येतो तो किरकोळ उच्चार व लिपीतले बदल करुन वापरला आणि इंग्रजीचे फक्त एक भाषा म्हणून (जसे की आजही घेतले जाते) शालेय जीवनात शिक्षण घेतले तर असे लेख किंवा मासिके इत्यादी वाचायला व समजून घ्यायला अडचण येणार नाही.

उदा.
Photosynthasis means the process in which light energy is transfer in to chemical energy with the help of chlorophyll.
या वाक्यातले फोटोसिंथेसिस आणि क्लोरोफिल हे शब्द जसेच्या तसे ठेऊन ही संकल्पना आपण मराठीतून शिकलेलो असलो आणि इंग्रजी फक्त एक भाषा म्हणून शिकलेलो असलो तरी चटकन लक्षात येते.
मूळात फोटोसिंथेसिस म्हटले की उर्जा रुपांतरणाची प्रक्रिया मनासमोर यायला हवी त्यात फोटोसिंथेसिसचा मराठी अर्थ प्रकाशसंश्लेषण, क्लोरोफिल चा अर्थ हरितद्रव्य (की लवके) आणि मग सारी प्रक्रीया असा किचकट प्रवास करायची गरजच नसावी.

इंग्रजीतले असे शब्द मराठीत भरमसाठ आले तर मूळ मराठी राहील का असा प्रश्न यावर हमखास येतो.
पण मूळ भाषा म्हणजे भाषेचे व्याकरण, त्यातली शब्दसंपत्ती तर भाषेला समृद्ध करते.
(पण संस्कृत शब्दानी भाषा समृद्ध होते आणि इंग्रजी, फार्सी शब्द भाषेचे प्रदुषण करतात हा दुटप्पीपणा आपण कधी सोडणार)
जोपर्यंत हे व्याकरण, भाषा व्यवहार करणाऱ्यांची भाषेची रुपे सुलभ करण्याची प्रवृत्ती (प्रमाणीकरणा वाल्यांच्या प्रमाण भाषेत गावंढळपणा) जो पर्यंत कायम आहे तो पर्यंत भाषा वेगवेगळी वळणे घेत समृद्ध होत राहणारच. पण आहे ते आपल्यापूरते मर्यादित ठेवण्याच्या अप्पलपोटेपणापोटी (मराठी भाषेतले तत्सम व तद्भव शब्द कोठले हे फक्त ठराविक लोकांनाच माहित असते परिणामी शुद्ध मराठी आम्हीच समजू शकतो हे ही आलेच) विज्ञान हवे इंग्रजीतूनच अशी भूमिका येते.

कालच कलेक्टरच्या पी.ए.ची आपाईंटमेंट घेऊन आलो. पूढच्या महीन्यात सेकंड विकला तुमचे काम सक्सेस होईलच अशी ग्यारंटी देलीय तेनं.
असं सहजपणाने बोलणारा सामान्य मराठी शेतकरी वर्गातल्या माणसाच्या घरातली मूलं फक्त भाषा म्हणून जरी इंग्रजी शिकले तरी चालेल.
इंग्रजी भाषेतून शिक्षण हा आग्रह नकोच.


परिस्थिती सुधारते आहे.

सध्या वीजमंडळाचे त्रिभाजन झाल्यापासून परिस्थितीत काही योग्य बदल घडतांना दिसत आहेत. उदाहणार्थ वीज चोरीचा गुन्हा अजामिनपात्र झाला आहे. राजकीय हस्तक्षेप बऱ्यापैकी कमी झाला आहे. आणि दिलिप वळसे पाटलांपासून सुरु झालेले वीज निर्मितीचे प्रयत्न आता अजित पवारांच्या कारकिर्दीत वेग घेत आहेत. म्हणजे अपेक्षित निधीची तरतुद वगैरे या प्रक्रिया जलद गतीने होत आहेत. शेवटी पाण्याची कमतरता हा प्रश्न कायमचा आहेच पण मागणी वाढत असतांना त्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीत वाढ करु शकले नाही हे ही सत्यच. गोडबोले समितीने महाराष्ट्राला आगामी काळात नव्या निर्मिती प्रकल्पाची आवश्यकता नाही असा अहवाल दिला होता. ( चालू वीज गळती (म्हणजे वीज चोरीच) थांबली की महाराष्ट्राला पूरेशी वीज उपलब्ध आहेच असे या समितीते म्हणणे होते. आणि ते खरे ही होते.) पण वीज चोरी थांबवण्यात आलेले अपयश आणि वाढत्या मागणीचा चुकलेला अंदाज या पायी महाराष्ट्र वीजेच्या बाबतीत दीनवाण्या परिस्थितीत येऊन पोहोचला आहे. पण पूर्वी सर्रास गावेच्या गावे आकडे टाकून वीज वापरायची ते चित्र आता दिसत नाही. मध्यमवर्गातही वेगवेगळ्या युक्त्या वापरून होणारी वीजेची चोरी नव्या डिजिटल मिटर मुळे कमी झाली आहे. विनाकारण वीज उपकरणे चालू ठेवण्याचे प्रमाणही (बील जास्त येईल म्हणून) कमी झाले आहे. एकंदरीत आगामी काही वर्षात वीजेची परिस्थिती समाधानकारक असेल अशी आशा करायला हरकत नाही.

तिसरी कंपनी. या कंपनीचे वीज वाहक जाळे अत्यंत जुनाट व अकार्यक्षम आहे. सरकारी कंपन्यांचे जेवढे म्हणून तोटे असतात ते त्यांना आहेत. त्यांची देखभालीची यंत्रणा अतिशय अकार्यक्षम व मोडीत काढण्याच्याच लायकीची आहे. या सर्व गोष्टींमुळे वीज गळती, चोरी या सारख्या अपप्रवृत्तींचे चांगलेच फावले आहे.
लेखकाचे वरील मत मात्र एकांगी वाटते. वीज काही तांत्रिक कारणामूळे जाते व नंतर ती पंधऱा मिनीटे ते तासभरात पूर्ववत होते हे म्हणजे मोडीत काढण्याच्या लायकीच्या यंत्रणेचे काम नक्कीच नसावे. महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळात व आजच्या त्याच्या नव्या स्वरुपातही त्रुट्या असतील यात वाद नाही पण तरीही या व्यवस्थेचे मानंदड आणि कामातील आजवरची प्रगती ही देखील नजरेआड करता कामा नये.

अवांतर आणि संशयास्पद
केंद्र शासनाच्या खाण मंत्रालयाने दगडी कोळशाच्या खाणी असणारे काही ब्लॉक्स खाजगी कंपन्यांना कोळसा काढण्यासाठी दिलेले आहेत. या कंपन्या पूरेशा कार्यक्षमतेने कोळसा काढत नाही म्हणून मंत्रालयाने नुकत्याच काही कंपन्यांना नोटीसा दिल्या. पाच कंपन्यांचे परवानेही रद्द केले. काही दिवसांपूर्वी राज्यांच्या उर्जामंत्र्यांची बैठक केंद्राच्या वतीने घेण्यात आली त्यात अजित पवारांनी या कंपन्या पूरेसा कोळसा पूरवत नसल्याबद्दल तक्रार केली. जो पूरवठा होतो तो ही निकृष्ट दर्जाचा कोळसा असल्याने तो वीज निर्मिती क्षमतेवर तसेच उपकरणांच्या आयुष्यावरही विपरीत परिणाम करणारा ठरतो.
यातल्या काही कंपन्या स्वतः वीज निर्मिती करणाऱ्या आहेत. महानिर्मिती कडून जेव्हा वीज कमी प्रमाणात निर्मीती होते तेव्हा महावितरणला ती खाजगी कंपन्यांकडून विकत घ्यावी लागते. (अर्थातच वाढीव दराने) महावितरणला अशी वीज विकणाऱ्या काही कंपन्याच कोळशाचा उपसा व पूरवठ्याची कामे कंत्राटी पद्धतीने करतात. परिणामी त्यांच्या या वागणूकीत काही संशयास्पद आहे काय अशी विचारणाही अजितपवारांनी या बैठकीत केली आहे. केंद्रातही राष्ट्रवादी सत्तेत भागीदार असल्याने हा प्रश्न गोपीनाथ मुंड्यांच्या मार्फत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्याची व्यवस्था करण्यामागेही कदाचित आपल्या राज्याचे उर्जामंत्री असावेत.

मराठीत इंग्रजी अशी नको

खरे तर महाराष्ट्रातल्या प्रमाणीकरण करणाऱ्या वर्गाने मराठी भाषा म्हणून आजपर्यंत जो घोशा लावला आहे तो ते जी तथाकथित प्रमाण भाषा बोलतात त्या भाषेपायीच आहे. इंग्रजी शब्दांचा आधार घेत सोवळेपणा जपतांना जी भाषा बोलली जाते ती सुध्दा मराठीच असल्याचा दावा ही मंडळी सहज करु शकतात (उदा.मला तरी दुसर्‍या भाषेतील शब्दांचा आधार घेण्यात काहीच गैर वाटत नाही. ) परंतु यातून एकच जाणीव स्पष्ट होते ती म्हणजे ग्राम्य म्हणून किंवा लोकभाषा म्हणून जी भाषा बोलली जाते ती मराठी मराठी भाषा जंतूसंसर्ग झालेली आहे. (दुसऱ्या भाषेचे रबरी ग्लोव्ह घालून निर्जंतूक करता येतं. ) आपल्याच भाषेतल्या या शब्दसामर्थ्याला आपण संसर्गासारखे टाळत असू आणि त्याहूनही त्यासाठी दूसऱ्या अर्थात प्यूअर भाषेचा आधार घेत असू तर आपण आपल्या भाषेवर अन्यायच करतो. आजकाल नाकाला शेंबूड आला असे न म्हणता नाक आले असे म्हणण्याची पद्धत होते आहे.


चला काही शब्द वाटत असतील आज लाजिरवाणे पण म्हणून मराठीतच त्याला सरळ सोपा पर्याय का शोधू नये. त्यासाठी प्यूअर भाषेचा आधार कशाला. ग्रामीण भागातच वापरले जाणारे पर्याय पहा.

संडासला जाणे - परसाकडे जाणे

साप चावला - पान लागलं

मासिक पाळी असणे - शिवायचे नाही.



अवांतर - जेव्हा एखाद्या परकीय वस्तूसाठी अथवा घटना प्रयोगासंबंधी आपण शब्दप्रयोग करतो तेव्हा तो ओढूनताणून मराठीत करायची आवश्यकता नसावी. कॉम्प्यूटर, रेल्वे, कॅलक्यूलेटर, टेलिफोन हे शब्द परकीय उपकरणांचे आहेत. त्यांच्या शोधकर्त्यांनी त्यांना तसे संबोधले मग आपण ते शब्दच मराठी म्हणून (उदा. कॅलक्यूलेटर हाच शब्द मराठी शब्द) वापरायला हवे. ऑक्सफर्ड च्या शब्दकोशात गंगा, कृष्ण हे शब्दच इंग्रजी शब्द म्हणून समाविष्ट झाले आहेत.

या अशा वापराने मूळ मराठी ही नामशेष न होता अधिक विस्तार पावेल.लवचिकता हा भाषा अस्तित्व टिकण्यातला महत्त्वाचा भाग ठरतो. एरव्ही ज्ञानेश्वरी व गाथेतली भाषा आजच्या भाषकांच्या निरुपणाशिवाय पचनी पडत नाही . परंतु तरीही तीही मराठीच होती आणि आजची भाषाही मराठीच आहे. उद्याची कदाचित इंग्रजी शब्दांनी समृद्ध असेल पण तरीही मराठीच असेल. एखादी भाषा ही तिच्या व्याकरणीक व स्वरसंरचनेच्या स्वरुपात मूलभूत स्वरुपात अस्तित्वात असते. उदा. माझे सरनेम जाधव आहे. हे मराठी वाक्य झाले. माझे आडनाव आहे जाधव. हे इंग्रजी .

महीलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण याबद्दल...

पुरूषांवर अन्याय?


या आरक्षणामूळे पुरूषांवर अन्याय होत असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत असले तरी तरी ते तसे नसुन माझ्या मते आजवरच्या पूरुषी वर्चस्वाचे परिमार्जन ठरावे. आजही शंभरटक्के जागांवर स्रियांना उभे राहण्याचे स्वातंत्र्य असले तरी किती टक्के स्रियांना लोकसभेला उभे राहण्यासाठी त्यांच्या घरातील पूरुष परवानगी (!) देतील याचा ही विचार व्हायला हवा.

पुरूषांना बंदी ?

स्रियांसाठी आरक्षित केलेल्या फक्त तेहतिस टक्के जागांवर पुरूषांना उभे रहायला बंदी असणार आहे. हा पदांसाठी इच्छुक पुरूषांवर अन्याय असला तरी आजवर पुरूषांनी स्रियांना शंभरटक्के जागांवर उभे राहायला अलिखित बंदी घातलेली आहे त्याचे काय?

पुरूष मतदारांवर अन्याय?

एखाद्या मतदारसंघात सगळे पुरूष उमेदवार असले तर तो स्रीमतदारांवर अन्याय ठरतो असे आपण म्हणू शकत नाही. त्याच न्यायाने स्री साठी आरक्षित मतदारसंघातील पूरुष मतदारांना उभ्या असलेल्या स्रियांपैकी कुणालाही मत देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतांना त्याला अन्याय कसे म्हणता येईल. कोणत्याही एका चांगल्या, सुशिक्षित, विकासाची जाण व तळमळ असलेल्या स्री उमेदवाराला मत देण्याचे स्वातंत्र्य (जे की आपण आजवर पुरूष उमेदवारांच्या संदर्भात भोगून आपल्या लायकी परीक्षणाचे अनेक नमूने उभे केले आहेत) असतांना एका स्रीला मत द्यावे लागणार म्हणून अन्यायाची बोंब ठोकणे हे अप्पलपोटेपणाचे लक्षण आहे.

पडद्यामागचे पुरूष?

स्रियांच्या आरक्षणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा कारभार पडद्यामागून पुरूष चालवतील, चालवतात हे मान्य. मूळात त्या स्रीला निवडणूकीला उभे करण्यासाठी तयार करण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत हे पडद्यामागचे पुरूषच कार्यरत असतात. मग ते त्या सत्तेच्या वापर करणारच झाले. पण एकदा सत्तास्थानी पोचलेली स्री ही नंतर आत्मविश्वासाने स्वतःचे निर्णय घेण्याच्या (प्रसंगी पुरूषांचा विरोध टाळून) क्षमतेपर्यंत येईलच.

मागासवर्गीय स्री?

स्रियांसाठीच्या आरक्षणात मागास व मुस्लीम स्रियांना आरक्षण असावे ही मागणी म्हणजे मागास स्रियांचे कैवारी असल्याचा डंका मिरवत पूरुषांचे फायदे जपण्याचा प्रकार दिसतो. परंतु तरीही स्रियांसाठीच्या आरक्षणांतर्गत मागास स्रियांसाठी आरक्षण ही या आरक्षणाची अनुभवांती पूढची पायरी होऊ शकते. या मुद्यापायी सगळ्या स्रियांच्याच आरक्षणात खोडा घालणे योग्य ठरत नाही.

एकंदरीत

स्री आजवर पूरुषाच्या हातचे शारीरिक, सांस्कृतिक आणि मनस्वी खेळणे बनून राहीली. पूरुषांनीही तिला कधी दासी तर कधी माता तर कधी देवी म्हणून झुलवत ठेवले. पण आपल्या अज्ञानापोटी आणि या अज्ञानातच आपला आत्मसन्मान मानण्याच्या व्यवस्थित (पूरुषांकडून) जोपासल्या गेलेल्या मानसिकतेपोटी स्रीने आजवर खऱ्या अर्थाने पूरुषाला आपले सर्वस्व बहाल केले आहे. तिने तिच्या अस्मितेची झापडे बंद केली असेही म्हणता येते त्याच बरोबर सगळे जाणवत असूनही पुरूषाशी मांडलेल्या सहजीवनापायी सारे सोसले असेही म्हणता येते. आज स्री आरक्षण म्हणा की अजून काही अशा बाबी म्हणा पूरुषांकडून स्रीला काहीतरी अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करतांना निदान जाणीवेच्या कक्षा विस्तारलेल्या माणसांनी तरी त्यांच्यातल्या पुरूषाला चरफडू देऊ नये असे वाटते.