महाराष्ट्रातील लोककलाप्रकारांत लोकगीते हा एक महत्त्वाचा भाग आहे. कुणीतरी अनामिक निर्माता असलेल्या या गीताचे सादरीकरण होता होता ते गीत जेव्हा साऱ्या समुहाचेच बनुन जाते तेव्हा त्याला लोकगीताचा दर्जा प्राप्त होतो. प्रसंगी लोकगीत ही समुहाची निर्मिती सुध्दा असते. आज महाराष्ट्रात लोकगीते म्हणून ज्या कॅसेट्स व सीडी प्रकाशित होत आहेत त्या गीतांकडे ही लोकगीतांची आधूनिक आवृत्ती म्हणून पहाता येते. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक लोकगीते एचएमव्हीच्या व आकाशवाणीच्या सहाय्याने घराघरात जाऊन पोहोचली व अजरामर झाली. त्यांची परंपरा नंतर पुढे आनंद व मिलिंद शिंदे यांनी काही प्रमाणात चालवली. काही प्रमाणात या साठी की आनंदमिलिंद यांनी नंतर लोकप्रियता व द्विअर्थी रचनांना जास्त महत्त्व दिले. खरे तर असे म्हणणे ही मलाच पून्हा एकांगी वाटते. आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या व त्यांच्या सोबत इतर समकालीन लोकगीत गाणाऱ्या गायकांची एकूण गीते पाहता त्यातल्या द्विअर्थी गाण्यांची संख्या मर्यादीतच आहे. परंतु या अशा द्विअर्थी गाण्यांना प्रसिद्धी मिळण्याचे प्रमाण मात्र अर्थातच जास्त आहे. अभिरुचीचे काही संकेत निर्माण करणारी व सर्वांवर ते संकेत लादू पाहणारी एकूणच व्यवस्था या व इतर गीतांकडे डोळेझाक जरी करत आली असली तरी जनमानसांवर या गीतांनी केलेली जादू मात्र नाकारता येणे शक्य नाही. जवा नवीन पोपट हा या गीताने आनंद शिंद्यांना प्रसिद्ध केले. हे गीत द्वीअर्थी नव्हते. त्यानंतर दरसाल एक तरी हीट गाणे देऊन त्यांनी आपला चाहता वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण केला. ज्या गीतांशिवाय अभिजनांच्याही लग्नाच्या वरातीला पूर्णत्व येऊ शकले नाही अशी गीते दरसाल प्रसिद्ध होणारी गीते आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेली आहेत. उदा.
हॅलो मी बाबूराव बोलतोय.
माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं.
हाताला धऱलया म्हणती लगीन ठरलंया
अशी अजूनही कित्येक गाणी लोकांच्या लक्षात असतील. आणि या गाण्यांना द्विअर्थी म्हणता येत नाही. अर्थात द्विअर्थी गाण्यांच्या बाबतीत आनंदमिलिंद शिंदे यांनी काही वेळा अगदी कहर केला आहे हे मात्र मान्य करावेच लागेल. प्रल्हाद शिंदे यांनी मात्र द्विअर्थी गाणी गायली नाहीत. त्यांच्या
कुठ जातील काळ्या पोरी
दिसते कोणाची गाडी
गोडीनं नांदाव लागंलं सखे
संसार माझा छान
कशाचं खरं खोटं पिकतय रं
सुय़ा घे गं दाभण घे
जीव लावा पोरीला माझ्या जावईबूवा
या आणि अशा कित्येक भावपूर्ण व सुरेल लोकगीतांच्या तुलनेत चल ग सखे पंढऱीला ही कॅसेट तुफान गाजली. कदाचित समाजमनावर असलेला भक्तीरसाचा पगडा व एचएमव्हीचे व्यवस्थित मार्केटींग या गोष्टी सुद्धा त्याला कारणीभूत असाव्यात. असो एकूण या टिपणात लोकगीतांच्या नावाखाली द्विअर्थी गाण्याची जी अभिरुचीहीन रेलचेल सध्या सुरु आहे तिचे समर्थन करण्याचा अजिबात उद्देश नाही. पण द्विअर्थी नसलेली आणि चाल आणि विशिष्ट ठेक्यावर ताल धऱायला लावणाऱ्या गाण्याच्या आस्वादापासून अभिरुची संभाळण्याच्या नादात कुणी दूर राहू नये असे वाटते. या निमित्ताने वाचकांनी आपल्या आठवणीतील काही या प्रकारची गाजलेली लोकगीते सांगावीत. या गाण्यांचे प्रकाशन जरी लोकगीते म्हणून होत असले तरी ती खरेच लोकगीते आहेत का यावरही अभ्यासूंनी अवश्य मत व्यक्त करावे. बाकी या गीतांच्या प्रसिद्धी मागच्या कारणांचीही चर्चा करता येईल.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा