श्रद्धेबद्दल किंवा अंधश्रद्धेबद्दल मत मांडतांना फार काळजीपूर्वक विधाने करावी लागतात. कारण केलेल्या विधानाला पटवून देण्याची जबाबदारी प्रत्येकवेळी आपल्यावर असते. तशी ती प्रत्येक ठिकाणीच असते. एक संवेदनशील माणुस म्हटला की त्याला जगाच्या वाईटाची चीड असतेच. आणि मानव्याच्या हिताच्या कसोटीवर एखादी गोष्ट उतरते का याचे उत्तर शोधत अशी संवेदनशील माणसे आपली मते बनवित असतात.
त्यांनी ती तशी बनवली की ती त्रिकालाबाधित सत्य असतातच असे मात्र नाही. अशी मते जशी जशी दृष्टी मिळेल तशी तशी बदलत जाण्याची आवश्यकताही ओघाने येतेच. एखाद्या श्रद्धाविषयाचा श्रद्धा बाळगणाऱयाला तोटाच सहन करावा लागतो आणि ती त्याने बाळगावी अशी हाकाटी पिटून कुणी त्याच्या तोट्यावर आपल्या फायद्याची पोळी भाजून घेत असेल तर ती श्रध्दा अंधश्रद्धा या सदरात टाकायला हवी. विठ्ठलाच्या दर्शनाने शब्दातीत असे काही समाधान मनाला वाटत असेल आणि 'नाही नाही फक्त दर्शनाने किंवा चिंतनाने असे समाधान वाटता कामा नये त्यासाठी अभिषेकच करायला हवा अन्यथा तुमचे समाधान म्हणजे निव्वळ थापाच.. ' असे म्हणून कुणी भरीस घालत असेल तर तुमचा प्रवास श्रध्देकडून अंधश्रद्धेकडे न्यायचा हा प्रयत्न आहे असे म्हणता येते. जीवन जगण्याला श्रद्धेचा आधार हवा हे एकूणच जगाच्या अथांग पसाऱयात मान्य करावे लागणारे विधान आहे. किंबहूना बहूतांश मानवसमुहांच्या बाबतीत ते तसे मानने गरजेचे ठरते. एखाद्या विवेकाने नास्तिकवादाचा पूरस्कार करणाऱया व्यक्तीची तो जर त्याच्या कुलदैवताच्या दर्शनाला गेला तर त्याची नेहमीची श्रध्दाळू मंडळी थट्टा करतील. त्याहीपेक्षा त्याने तेथे जाऊन अभिषेकच केला नाही. निव्वळ हात जोडून परत आला. म्हणजे सगळी दर्शनयात्रा फुकाची गेली असे म्हणून त्याला मुर्ख ठरवण्यात त्यांची अहम्अहीका लागते. मी लग्न झाल्यावर तुळजापूरला गेलो आणि आम्ही फक्त दर्शनाला आलो आहोत आम्हाला अभिषेक वगैरे काही करायचा नाही असे स्पष्टपणे अभिषेकाचा आग्रह धरणाऱया व्यक्तीला सांगितले. (त्याने अभिषेकाचे एकशे एक्कावन्नवाला, पाचशे एकवाला आणि एकहजार एक्कावन्नवाला असे प्रकार सांगितल्यावर मला मळमळायला लागले होते. माझ्या मित्रांच्या मते मी कमालीचा चुंगूस असल्याने असे झाले असावे.) तेव्हा त्याने मग एवढ्या दूरवर आलातच कशाला असे स्पष्टपणे मला विचारले. आता तर अभिषेकांच्या अतिरेकाने तुळजाभवानीच्या मुर्तीची झीज होत आहे आणि या अभिषेकातल्या आम्लधर्मी पदार्थांवर व एकूणच अभिषेकांच्या संख्येवर नियंत्रण न आणल्यास मुर्तीची न भरून येणारी हानी होऊ शकते असा अहवाल पुरातत्व खात्याने दिला आहे. यावर नेमकीच पूजारी मंडळींची बैठक जिल्हाधिकाऱयांनी बोलावली होती. त्यात या सर्व बाबींना कडाडून विरोध करण्यात आला. त्यासाठी भाविकांच्या श्रद्धेचे कारण देण्यात आले. मला वाटते मुर्ती हवी की अभिषेक असा प्रश्न निर्माण होत असेल तर भाविकांनी अभिषेकाच्या बाजूने असण्याचे काहीच कारण नाही. पंढऱपूरला अशा अभिषेकांवर यापूर्वीच नियंत्रण आणल्या गेले आहे. पण आर्थिक लाभार्थ्यांना त्याच्याशी काहीही घेणेदेणे नसावे. मला तरी वाटते पंढरपूरच्या विठ्ठलातले देवत्व जसे अस्पृश्य़स्पर्शाच्या भीतीपायी काढून ठेवण्यात आले होते तसे भवानीमातेतले देवत्व काढून एखाद्या कठीण संगमरवरी मुर्तीला घडवून तिच्या ठायी ठेवावे आणि मग अभिषेकांचा हा सोपास्कार चालू ठेवावा. मग भाविक नेमके अभिषेकांच्या पक्षातले आहेत की देवीच्या फक्त दर्शनाने त्यांना नवी उभारी मिळते ते सिद्ध होईल. शेवटी श्रद्धाविषय हा कुणाच्या (म्हणजे कुणा समुहाच्या ) आर्थिक, सामाजिक, राजकीय अथवा सांस्कृतिक फायद्याचा विषय म्हणून तो जनमानसांचा तोटा करून लादला जातो काय हे पहाणे महत्त्वाचे आहे. श्रद्धा चांगली की वाईट याचे उत्तर हे दोन्ही प्रकारांना देता येते. श्रद्धा खऱी की खोटी याचे उत्तर मात्र ती खरेच आपणाला काही मानसिक समाधान देते आहे की आपण लुबाडलो जात आहोत, निष्क्रीय बनत आहोत आणि फुकटच्या फायद्याची अपेक्षा करत आहोत. स्वतःला किंवा कुणाला फसवत आहोत, लुबाडत आहोत, पांगळे करत आहोत या प्रश्नाच्या उत्तरात आहे. विलासराव देशमुखांना हवेतुन तावीज काढून देणाऱया सत्य(?) साईबाबा विषयी आणि विलासरावांच्या त्यांच्या प्रती असलेल्या श्रद्धे(?)विषयी आपण ऐकले, वाचले असेल. (त्याच विलासरावांच्या मुख्यमंत्री काळात अंनिस जादूटोणाविरोधी कायदा अमलात येण्याची अपेक्षा करीत होती) आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच अशोक चव्हाणांनी या बाबांची पाद्यपूजा वर्षा या सरकारी निवासस्थानी आयोजित केली आहे. अशोकरावांचे म्हणणे आहे की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे मग त्यांनी हे सगळं नांदेडला का आयोजित करू नये हा ही प्रश्न उरतोच. महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून जे काही गेल्या दहा वर्षांपासून अस्तित्वात येण्याचा प्रयत्न करते आहे. त्याचा जन्म या अघोरी प्रकाराने होईल याची अपेक्षा विवेकी महाराष्ट्राने बाळगू नये. कारण सत्तेच्या पायरीवर पोचण्यासाठी जनतेच्या भल्याचा विचार करायचे सोडून बाबाबूवांची मनधरणी करणाऱयांचाच सगळीकडे बोलबाला आहे. अशोक चव्हाणांना आता महाराष्ट्रानेच या बाबांचे नाव मतदारयादीत नसल्याचे दाखवून द्यायला हवे. अवघे राज्य ज्या सरकारवर विकासासाठी विसंबून आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच ठायी आत्मविश्वासाची वानवा असावी यापेक्षा दूर्देव ते कोठले.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा