घाव अजुनी...

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

पुन्हा

कशालाच नसतो
कसलाच अर्थ
असा साक्षात्कार झालाय
अखेरीस....!

दारूच्या ग्लासात
विरघळवून टाकल्या आहेत
बऱ्याच कविता...

मग मनोमन असं वाटलं की
आता हाडेही शिल्लक नसतील त्यांची..

पण नंतर पाहातोय तर
या सगळ्या हलाहालातुन
पुन्हा नव्याच कविता
जन्माला आल्याहेत..

आणि आता तर
त्यांच्या भाळी झळाळतेय
अमरत्वाची खूण...

मी जीव एकवटून
नष्ट करू पहातोय
त्या संजीवन कवितांना..

अन् पुन्हा जन्मास येताहेत
नव्या कविता...!
***