घाव अजुनी...

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

वरुणयंत्र

डॉ.राजा मराठे यांनी तयार केलेल्या वरुणयंत्राचे प्रयोग सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सुरू आहे. सकाळ या वृत्तपत्राने या प्रयोगाच्या प्रचार व प्रसाराल अग्रक्रम दिल्याचेही दिसून येते आहे. (इतर वृत्तपत्रांना मात्र याचे वावडे असल्यासारखे वाटते). आयआयटी चे पदवीधर असलेले मराठे यांनी हे यंत्र विकसित केले आहे. हवेची विशिष्ट आर्द्रता, आकाशातील ढगांचे प्रमाण यांचा मेळ जुळला की या वरुण यंत्राच्या साहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे (ढगांचे) सांद्रीभवन होण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्प्रेरकाचा पूरवठा झाला की चोवीस तासात पाऊस पडतो असा मराठे यांचा दावा आहे. उत्प्रेरक म्हणून मिठाचे कण हवेत पोचवण्यासाठी भूस्सा, लाकडे, कचरा यांची होळी करून त्यात मीठ टाकले की ते ढगांपर्यंत पोहोचते अशी या प्रयोगाची संकल्पना आहे.  असो.

या प्रयोगाबद्दल जिज्ञासू व विज्ञानाबद्दल, पर्यावरणशास्र, हवामानशास्र यांतील तज्ज्ञ लोकांनी अजूनपर्यंत अनुकूल किंवा प्रतिकूल अशी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सकाळने मात्र वरुणयंत्राच्या प्रयोगानंतर (किंवा प्रयोग सुरू असतांच) पाऊस . (हा पाऊस चोवीस तासांनी पडतो की चोवीस तासात या बद्दल स्पष्टीकरण सापडत नाही ) अशा आकर्षक जाहिरात वजा बातम्यांचा मारा सुरू ठेवला आहे. अर्थात चांगल्या गोष्टीची जाहिरात व्हायला हवीच. पण सततच्या जाहिरातींनी एखादी गोष्ट चांगली वाटायला लागते हे ही लक्षात घेतले पाहिजे.

मिठाचा असा उत्प्रेरक म्हणून वापर करुन खरेच ढगातील वाफेचे पावसाच्या थेंबात रुपांतर होण्यचा वेग वाढवता येतो का? माझ्या माहिती प्रमाणे तर वाफेचे पाण्यात रुपांतर होण्याची क्रिया ही भौतिक क्रिया आहे. अशा भौतिक क्रियांमध्ये उत्प्रेरक वगैरे असते का याबद्दल मी जरा अज्ञानीच आहे.

वर सांगितल्या प्रमाणे हवेतील आर्द्रता आणि ढगांचे प्रमाण यांचा अपेक्षित मेळ जमला की हा प्रयोग करता येतो. आणि मग चोवीस तासात पाऊस पडतो. पण असा मेळ जमणे हे निव्वळ नैसर्गिकरित्याच फक्त होऊ शकते. आणि असे घडून आल्यावर आपसूकच पाऊस पडत नाही काय. किंवा पाऊस पडण्याच्या शक्यतेची टक्केवारी वाढत नाही काय.

कुठल्याही कामामागे कोणाचा हातभार व सहभाग आहे या वरुन कामाची किंमत कमी किंवा जास्त मानन्याची एक जून खोड काही जणांना असते. खरे तर ह्या कामाच्या उपयोगितेतली व यशातली वैश्विकता हा निकष कामाची प्रत ठरवण्यासाठी वापरला जावा. वरुण यंत्रावरची एक मजेशीर प्रतिक्रीया वाचनात आल्याने हे लिहीले आहे.

ती प्रतिक्रिया अशी -श्री. मराठेसाहेब नमस्कार, आपण एकप्रकारे होम करून पाऊस पाडण्याचा प्रयोग केला आहे. हेचकाम आपण वीज निर्मिती केंद्रात चिमणी मध्ये ढगाळ वातावरण असताना मीठ टाकून कमी खर्चात आणि जास्त प्रमाणात करू शकतो असे मला वाटते. हा प्रयोग सरकारी मदत घेऊन करावा लागेल. कितपत जमेल याबद्दल शंका आहे. आपण सर्व प्रयोगकर्ते चित्पावन ब्राम्हण आहात याचे मला कौतुक वाटते .

असो वरुणयंत्राचा मंत्रालयातही प्रयोग झाल्याचे वाचनात आले आहे. जर हे प्रकरण खरेच मानवजातीच्या इतक्या उपयोगाचे असेल तर यावर लगेच सरकारने पाडताळणीसाठी तज्ज्ञांची समिती नेमायला हवी.

1 comments:

sharayu म्हणाले...

मीठ पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेते याचा आपणाला अनुभव असेलच. ढगांमधील पाण्याच्या थेंबाचा आकार अत्यंत लहान असतो. हवेच्या खालून वर पडणाऱ्या दाबामुळे हे थेंब तोलून धरले जातात. मीठ काही थेंबाना एकत्र आणून हवेच्या दाबाला न जुमानणारा मोठा थेंब बनविते. ही क्रिया मोठ्या प्रमाणात झाल्यास पाऊस पडणे शक्य आहे.